कैकदा खोटं बोललोय आईला.
'मी जेवलोय' असं सांगितल्याशिवाय ती जेवायचीच नाही
मात्र पहिला घास तिच्या ओठावर येण्याआधीच
ती डोळ्यात रोखून बघायची,
तिथून थेट काळजात उतरायची!
'बापू तू मला फसवू शकत नाहीस' असं म्हणत
डोक्यावरून हात फिरवत तोच घास भरवायची
माझं जेवण होईपर्यंत समाधानाने पाहत राहायची
मग कुठे, ती जेवायची.
आता अमृताचे घास आहेत पण ती चव नाही,
कारण आता आई देहरुपाने नाही.
मात्र ती वाहते डोळ्यांच्या कडांतून
ती अजूनही तेवते
देव्हाऱ्यातल्या निरंजनातून..
खिडकीतून येणारा अवखळ वारा
तिचा गंध घेऊन येतो.
परसातल्या जाईच्या वेलीत ती दरवळते
प्राजक्ताचा सडा होऊन ती अंगणात बरसते
वृंदावनातल्या तुळशींच्या मंजुळेत ती झंकारते
आई नाही अशी कुठली जागा नाही,
ती माझ्या रोमरोमात वसते
रोज रात्री निजताना
श्वासात माझ्या पाझरते
डोळे मिटताच प्रकटते.
भाळावरुनी हात फिरवते
तिच्या सायमाखल्या हातांची पुन्हा पुन्हा अनुभूती येते...
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment