Monday 22 March 2021

हे रस्ते संपू नयेत..

काही वेळात सूर्यास्त होईल
घराकडे निघणारी पावले आता पहिल्यासारखी असोशीने पडत नाहीत
ती रेंगाळतात रस्त्यावरच्या रोषणाईत, स्ट्रीटलाईटच्या गर्द फिकट उजेडात
सकाळी दुपारी सावल्या देणारी झाडं फांद्या वाकवून उभी असतात सांजेस
ती वाट पाहतात उरल्या सुरल्या पक्षांची
जी अजूनही शहरातल्या झाडांवर जीव लावून आहेत
त्यांचा परतीचा किलबिलाट ऐकून झाडे रस्ते तृप्त होत असतील
कदाचित संधीकाळास देखील त्याची लत लागली असावी
पण आमचं काय ?
घरातून निघणं आणि घरी परतणं
ही क्रिया इतकी निर्जीव कशी झाली याचे उत्तर शोधतोय
बऱ्याचदा सांजेस शहरातल्या रस्त्यांवरचा कोलाहल खूप आधार देऊन जातो
एकटं असल्याची जाणीव करकचून मोडून काढतो
कधी कधी वाटतं
ही संध्याकाळ, हा गोंगाट संपू नये, हे रस्ते संपू नयेत
नेमकी ही कशाची ओढ आहे कोडं काही सुटत नाही..

- समीर गायकवाड 

Saturday 6 March 2021

रंग उदास झाला...

जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला...
हंबरला पिंपळ सांज आभाळी साकळताना
 
शांत जलौघात उतरले प्रतिबिंब अखेरच्या पक्षांचे
घुटमळला प्रवाह नदीचा शोधता तिच्या ठशांना.
 
मेंदीचा हातावरल्या तिचा गंध उरला भवताली
जडशीळ झाली नदी वाहून तिला नेताना

गेले स्वप्न विरघळून पापण्यात चिणलेले
गहिवरल्या चांदण्या डोळ्यात निष्प्राण डोकावताना
 
जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला
मुका झाला रावा चंद्रकोरी आड जाताना....
~~~ ~~~~ ~~~ ~~~~ ~~~~~
या कवितेची पार्श्वभूमी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. बनारस म्हणजेच वाराणसीच्या
मणिकर्णिकेच्या घाटावर मृतदेहांवर संस्कार करण्याचं काम अविरत सुरु असतं. दहन देण्याआधी जातधर्म कुळ गोत्र सांगावं लागतं. मग मुर्दहिया त्या प्रेताचे अग्नीसंस्कार पार पाडतो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बनारसमधील शिवदासपूर या वेश्यावस्तीत मरण पावलेल्या बायकांना इथं दहन दिले जात नसे. इतरत्रच त्यांचे विधी पार पाडावे लागत असत. १९९२ मध्ये अकाली मरण पावलेल्या जसोदाबाई या तरुण वेश्येचा मृतदेह अन्य वेश्यांनी लपूनछपून घाटापाशी आणला. मात्र स्त्रियांना पुढे येण्याची अनुमती नसल्याने त्यांनी वेगळी शक्कल लढवली. घाटाच्या पुढच्या भागात त्या गोळा झाल्या आणि जसोदेच्या इच्छेनुसार अग्नी न देता तिला गंगेच्या हवाली केलं. असेही तिथे अर्धेमुर्धे जळालेले मृतदेहही बऱ्याचदा गंगेत सोडले जातात. त्या अर्धवट जळालेल्या कलेवरांच्या साथीने जसोदेचा देह वाहत गेला. काही दिवसांनी बिंग फुटलं. पोलिसांना बायकांना दम देऊन सोडलं. आता परिस्थिती बदलली आहे मात्र रिवाज तेच आहेत. ही कविता जसोदेसाठी लिहिलीय....

मरणाऱ्याच्या पाठीमागे...

कुणी एक मरण पावल्याची बातमी कळताच 
अर्ध्याहून अधिकांना यात स्वारस्य असतं की 
काय झालं ? कशामुळे मरण आलं ?

वास्तवात हे कशासाठी जाणून घ्यायचं असतं ?
मरण कसं आलं हे उमगताच मृताबद्दलचे पूर्वानुग्रह कच्चेपक्के करायचे असतात
व्यक्ती मरण पावल्यावर श्रद्धांजल्या वाहताना ते कामी येतात !

एक सांगू का ? 
माणूस मेला बात खतम. 
मागच्या श्रद्धांजल्या सब झूठ

एक शिरस्ता म्हणून जगाप्रमाणेच मी ही वाहतो श्रद्धांजली
पुढच्याच क्षणाला दुसऱ्या एकाला देतो शुभेच्छा
सारंच कोरडं... 

तरी एक बरे झाले 
की इमोज्या आल्या. चार शब्द टायपायचे कष्ट वाचले
तसेही श्रद्धांजली, शुभेच्छाही कॉपीपेस्टेड असतात तरी कुणाला कळते काय ?

अपवादाची बेसरबिंदी सोडता  
तिथं सारा समांतर शुष्क भावबाजार
स्वस्त झाल्या भावना नि फुटकळ झाले प्रकटन विचार ... 

लोक वदतात बद्धकोष्ठी भाव आणून, 
कुणी म्हणतो मोठी पोकळी निर्माण झाली. अपरिमित हानी झाली 
अमुक एक पोरकं झालं. वाणी खुंटली. स्तब्ध थिजून अबोल झालो...

खरं तर सर्वांनाच ठाऊक असतं की 
घंटा फरक कुणालाच पडलेला नसतो
ज्याचं रक्ताचं गेलेलं असतं त्याचा तरी शोक किती खरा असतो ?
 
किती एक बोल फुकाचे 
खरे तर हे नाममात्र दाखले सुखदुःखात सामील असल्याचे
भीती असते भावनेच्या प्रवाहात नसलो तर संवेदनहीन ठरण्याची  

वास्तवात इथल्या रोजच्या मरणांचे दुःख तरी किती कुणी आणि का करावे ?
बरे झाले दोस्त हो 
मरणाऱ्याला कळत नसते, जग पाठीमागे त्याच्याबद्दल काय बोलत असते !

- समीर गायकवाड

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...