घराकडे निघणारी पावले आता पहिल्यासारखी असोशीने पडत नाहीत
ती रेंगाळतात रस्त्यावरच्या रोषणाईत, स्ट्रीटलाईटच्या गर्द फिकट उजेडात
सकाळी दुपारी सावल्या देणारी झाडं फांद्या वाकवून उभी असतात सांजेस
ती वाट पाहतात उरल्या सुरल्या पक्षांची
जी अजूनही शहरातल्या झाडांवर जीव लावून आहेत
त्यांचा परतीचा किलबिलाट ऐकून झाडे रस्ते तृप्त होत असतील
कदाचित संधीकाळास देखील त्याची लत लागली असावी
पण आमचं काय ?
घरातून निघणं आणि घरी परतणं
ही क्रिया इतकी निर्जीव कशी झाली याचे उत्तर शोधतोय
बऱ्याचदा सांजेस शहरातल्या रस्त्यांवरचा कोलाहल खूप आधार देऊन जातो
एकटं असल्याची जाणीव करकचून मोडून काढतो
कधी कधी वाटतं
ही संध्याकाळ, हा गोंगाट संपू नये, हे रस्ते संपू नयेत
नेमकी ही कशाची ओढ आहे कोडं काही सुटत नाही..
- समीर गायकवाड