इवलेसे दात होते अन चणे मात्र पोलादाचे होते.
काट्याकुट्यांच्या वाटेवर अनवाणीच पाय होते.
मातीची कूस होती अन आभाळाचं छप्पर होते.
वावटळींच्या सोबतीला रखरखणारं ऊन होते.
कोरडे होते ओठ तरी डोळ्यात मात्र पाणी होते.
फाटके होते कपडे तरी शील मात्र शाबूत होते.
पोटपाठ एक झाली तरी हात पसरलेले नव्हते.
पाऊल घसरलं तरी सावरायला मायबाप होते.
झिजला जरी देह तरी समर्पणातच सुख होते.
सावलीच्या बेटावर आता मोरपंखी आयुष्य जगतो
गतकाळाच्या आठवणींनी तरीही जीव व्याकुळतो ...
- समीर गायकवाड.