Wednesday 24 April 2019

चव ..


तलम त्वचेवर व्रण पडावेत तशी माळरानात पालं पडतात ..
आभाळाला भळभळून खोक पडल्यागत
मातीच्या छातीवर चुलवणं उभी ठाकतात.
खुरपल्या हातानी घट्ट मरणमेखा ठोकल्यावरही
कधी पालं टिकतात आदिम चिवट मुळांगत तर कधी
वर्णभेदी वादळाच्या विकट तडाख्यात उन्मळून पडतात !
रणरणत्या दिर्घउन्हांत
जायबंदी हरणासारखी पालं दिवसभर बसून कण्हत असतात.

बदला


सादळल्या जीवाचा जड झाला भार,
भादव्याची काहिली घामाचे येरझार,

थकल्या पायाला फुफुटयाचा आधार,
बाभळीचा काटा कुठून शिरे आरपार ?

रांडाव आभाळाचा कसा नेभळा संसार,
विझल्या चुलीत जळे सारे घरदार,

धगाटल्या वारयाचा फणा शिवारभर,
वसुंधरेच्या मस्तकी का पापाचा भार ?

पिसाळल्या मातीने गिळले जलशिवार,
देहाच्या चकव्यास श्वासाचीच घरघर

डोळ्यातल्या उन्हाची भूल अश्रूंच्या पार,
उघडणार कधी रे तुझ्या दयेचे दार ?

चिपाडल्या झाडांच्या पाना लागे कातर,
फुलांच्या गावी आता कायेचे व्यापार,

थिजल्या काळजाला वाटे पैलतीराचा भार,
कुण्या पापाचा बदला घेशी वारंवार ?

- समीर गायकवाड

गल्बला ..



गाव फुलांचा सोडून काय ती गेलीसुगंध की इथला निमाला.

वाराच तो सैरभैरज्याने पत्ता नवा तिचा अकस्मात कळवला.

वाऱ्यास गंधवेड्या विचारले, "शोध तिचा कसा काय लागला ?"

"आसमंत देहगंधाने तिच्या दरवळला त्यानेच की माग लागला"

तलम अस्तुरीगंधबेधुंद कसा राहीन लपूनकरी तो गल्बला !

स्वप्न...


विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम 

चंद्रात भाकरीच्या झिरपते अलगद मन.

परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,

मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीचा पदर,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.

कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,

शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..

येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,

एकुलत्या खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती जुन्या आठवणीसंगं तिथं

- समीर गायकवाड.

पावसाची घुसमट ...


आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
मातीच्या कुशीत तोंड खुपसून मनसोक्त रडतोय,
कळ्याफुलांना न्हाऊ घालून अलगद ओघळतोय ,
फांद्यांशी गप्पा करून बुंध्याशी बिलगतोय,
पानगळीतल्या पानांशी श्वासाच्या गुजगोष्टी करतोय. ....

आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
मंदिराच्या कळसाला अभिषेक करतोय ,
दर्ग्याच्या मिनाराभोवती सुफियाना गातोय,
पारावरती शैशवाच्या स्मृती जागवत नाचतोय,
कर्दमलेल्या ओढ्यातून मनमुराद लोळतोय......

कावळा



माळावरच्या ओसाड दुनियेत भकासलेली उनाड पाखरं भिरभिरतात,
तेंव्हा पायाखालचं अस्ताव्यस्त अरबट चरबट तणसुद्धा मखमली वाटतं
गुरांच्या कळपापाशी उभारता डोक्यातलं जित्राबसुद्धा कान टवकारतं.
वठलेल्या झाडावरची साल आपल्याच अंगावरून सोलून काढल्यासारखी वाटते,
खुनशी वारा हवेचे रकाने पाचोळ्याने भरत, रोंरावत राहतो,
चिलबटलेल्या पोराबाळांच्या डोळ्यातील स्वप्नेही त्यातून सुटत नाहीत,
तेंव्हा त्याच्या वावटळीवर स्वार होऊन सटवाईला भेटावंसं वाटतं.
रखरखत्या उन्हाची सहस्त्रावधी शकले करावी वाटतात,
कलता सूर्य बेसावध चोरपावलांनी गवताच्या पात्यातलेही बाष्प शोषून जातो !
रापलेल्या चेहऱ्यावरच्या अन उसवलेल्या तळहाताच्या रेषा कुरतडल्या जातात
तेंव्हा, 'परमेश्वराच्या दाराला काठी लागो' म्हणावंसं वाटतं
चडफडाट ऐकू आल्यागत आभाळाआडून तो फिदीफिदी हसतो,
मरणासन्न हडकुळया गाईच्या अंगावर कावळा होऊन बसतो !
उदासलेल्या जीर्ण चेहऱ्यांच्या विहीरडोळ्यात आरपार उतरत जातो !!

नाच...


का रे पडतोस तू असा ? माझे घर जाते ना कर्दमून, 
अन छत लागते की ठिबकाया !
ओलेत्या अंगावर ल्यावे लागते ओलेतेच धडूते, 
ज्याची आधीच गेलेली असते रया !

पाणी झिरपते कुडातून, सरपण जाते चिंब भिजून 
अन चूल बसते डोळे मिटून !
गळक्या छपराखाली पातेले पडते अडकून, 
सांग आता सैपाकास भांडे आणू कुठून ?

हे सावित्रे...




गल्लोगल्लीचे सत्यवान दारू ढोसून
बायकोला मारत असतात गुरागत.
इच्छा असेल तेंव्हा हवं तसं भोगतात,
भले मग तिच्या अंगात ज्वर असला
तरी तिने कन्हायचे नसते.

तिने मारायचे असते मन,
तो सांगेल तेच कपडे घालायचे असतात,
त्याच्या आवडीनुसारच नटायचं असतं.
त्याच्याच फर्माईशीवर तिने जगायचं असतं.
त्याने बाहेर तोंड मारलं तरी तिनं दुर्लक्ष करायचं असतं.
काहीही झालं तरी
मान वर करून परपुरुषाच्या नजरेत नजर घालून बघायचं नसतं.
ताट आणि खाट यांच्याच कक्षेत तिने गुरफटून घ्यायचं असतं.

मुक्त....


पत्ता माझा शोधण्यास हा गंधच तुला कामी येईल,
काळीज जळतानाचा दरवळ तुझ्या परिचयाचाच असेल !
काळोख कितीही झाला तरी दिशा तुला गवसतील
पावलो पावली मातीत शिंपडलेले रक्त माझेच असेल !
भिऊ नकोस कुण्या पावसाला अन वाऱ्या वादळाला
अंतःकरणी तुझ्या तेवणारा दिवा माझ्याच आत्म्याचा असेल
तू फक्त एक कर जेंव्हा खोल दरीच्या टोकापाशी येशील
एक शिळा ढकल, ती ज्यावर पडेल ती कबर माझीच असेल !
स्पर्श तुझा ज्या पत्थरास होईल त्याचे सुमन होईल
जाणीवांनी त्या पुष्पगंधाच्या मुक्त होणारा जीव माझाच असेल !! 

- समीर गायकवाड 

वीजेस आलिंगन..


पाऊस दिवसागणिक आक्रसत जाताच,

देहात झाडांच्या साकळते आभाळ,
सांजेस क्षितिजाच्या तळाशी,
दाटत जातात कळप लाल तांबड्या हत्तींचे
डोहात पाण्याच्या म्लान,
विरघळते त्रिकोणी प्रतिबिंब थकल्या पक्षांचे
थरथरती गायी गोठ्यात खाली घालून माना
डोळ्यात साठवत शुष्कचंद्र
पायवाट शेताची तरळता येते उचंबळून.
होतो मनात कोलाहल रित्या मेघांचा
कर्दमलेले पाय घेऊन स्वप्नात,

अंथरतो बिछाना कौलावर देण्या वीजेस आलिंगन .....

जमाव


पाच भिकारी जमावाने जिवंत ठेचून मारले,
आम्ही निर्विकारपणे त्याचे व्हीडीओ पाहिले,
चोरी, अपहरण, छेडाछेडी, धर्मभेद, वर्चस्ववाद, गोहत्या, गोवंश मांस 
कसलाही संशय जमावास पुरेसा असतो.
वर्तमानपत्रीय भाषेनुसार गत काही दिवसांत 
हिंस्त्र जमावाने प्रक्षुब्ध होत अनेकांना नेमके 'वेचून' हालहाल करून ठार केले.

बहर

काळोख कापून आलोय तुझ्या दारी, हवे तर मला नकोस बिलगू 
काळजाताला माझ्या काढून घे चंद्र, उजळून उठेल तुझी हवेली 
गीत तुझ्या प्रकाशाचे लिहिण्यासाठी, गहाण टाकलीत बोटे कनवाळू 
तोरण दुसऱ्याचे बांध खुशाल, दुनिया कधीच मला विसरून गेली.
रडला निशिगंध जरी कर्दमल्या रात्रीस, नकोस त्याला चुरगाळू
सांग चुका माझ्या त्याला, स्वप्ने निरागस भुलून खंजिरास गेली
आली चुकून आठवण कधी माझी, तर नकोस छद्म अश्रुंचे ढाळू
प्राजक्तातच बहरतो मी, म्लानफुले त्याची चिरडून फुलत तू गेली....

- समीर गायकवाड 

पाऊस ..


पाऊस पडता गर्जून,

अंग जाई भिजून,
रस्ते निघती धुवून,
गवत येई खुलून,
वेली जाती फुलून l

पाऊस पडता गर्जून,

पक्षी उडती सरारून,
आभाळ जाई भरून,
शाळा वाहे भरून,
दप्तर जाई भिजून l

दांभिक..

झाडे एकमेकांना खेटून वाढतात,
माती लाल असली काळी असली तरी जगतात ,
झाडे एकमेकांना त्रास देत नाहीत
परस्परांच्या फांद्यावरती माथा टेकवत आनंदानं राहतात.
कोणताही पक्षी कुठल्याही झाडावर घरटी बांधतो,
झाडे त्यांना अडवत नाहीत
त्यांचे जातपंथ, नावगाव कुळ गोत्र विचारत नाहीत.
वेणुनाद हिरव्या पिवळ्या पानात भेद करत नाही,
पाने कुठलीही असो वारा त्यांना गोंजारूनच जातो.
सूर्यप्रकाश सगळीकडे तोच दिसतो
त्याची आभा, त्याचे तेज, त्याची झळाळी तशीच जाणवते.
अंधाराच्या डोहात उतरलेलं चांदणंही सगळीकडे सारखंच असतं,
ना काळोख वेगळा असतो, ना रात्रकळा वेगळ्या असतात.
जमीन असो वा समुद्र डोक्यावरचं आभाळ सर्वत्र निळंच असतं.
माणूस कोणताही असो त्याचे अश्रू खारटच असतात नि सर्वांचे रक्तही लालच असते.

सिंह अजूनही गवत खात नाही की हरीण मांस खात नाही. 
विश्वातले सर्व गुणधर्म जसेच्या तसे टिकून आहेत अपवाद फक्त माणसाचा आहे,
भेदाचा विखार त्याच्या नसानसात खोलवर भिनला आहे,
तरीसुद्धा माणूस स्वतःला पृथ्वीवरचा सर्वात विचारी आणि विवेकी जीव म्हणवून घेतो !
हीच खरी दांभिकता आहे ..
हीच खरी दांभिकता आहे...

- समीर गायकवाड 

अखेरची भेट...


भौरम्माने समुद्र पाहिलेला नव्हता,
समुद्र पाहण्याची तिची अनिवार इच्छा होती.
ती मरण पावल्यावर
गावातल्या लोकांनी तिची रक्षा समुद्रात अर्पण केली....
भौरम्माच्या रक्षा कलशातून विलापध्वनी येत होते,
जणू ती हमसून हमसून रडत होती.
मरणाआधी कित्येक महिने
ती अंथरुणाला खिळून होती,
अखेरचे काही दिवस तर ती बेशुद्ध होती.
गावाने तिची अपार सेवा केली.
तिचे मोठे सरण रचले,
अख्खं गाव लोटलं होतं तिच्या दहनाला
शेजारच्या विश्वनाथनने अग्नी दिला होता.

रिजेक्ट..


ते कुठेही दिसतात.
डांबरी रस्त्याचे उध्वस्त कोपरे, 

अवाढव्य पुलांखालचे काळोखे कोनाडे
गर्दीने सुजलली रेल्वे स्टेशन्स, 

बस स्थानकं, सिव्हील हॉस्पिटल, 
अस्ताव्यस्त रहदारीने व्यापलेले सिग्नल्स.

ते कळकटून गेलेले. अजागळ अस्वच्छ किळसवाणे.
केसाच्या जटा, अंगावर धुळीचे पुटे, काळवंडलेल्या कपड्यांची लक्तरे.
भेगाळलेले ओठ, हातापायाची वाढलेली नखे. 

चिरलेले तळवे आणि धूळधुरातही चालणारे फुफ्फुसांचे भाते.
चिल्बटलेले केस अन घामेजलेलं अंग.
कधी मळकटलेली पथारी पसरलेली तर कुठे चवाळे अंथरलेलं. 

शेजारीच करकचून आवळलेलं कसलं तरी गाठोडं.

प्रतिक्षा



कधी आलीस घरी परतुनी जरी, दारात मी उभा असेन नसेन....
प्रतिक्षेचे सुकलेले ताटवे झुलतील, अंगणात तुझ्या स्वागतासाठी.
दारावरचे तोरण सांगेल, झुरलो किती युगे मी तुझ्या दर्शनासाठी.
मंजुळांच्या देहातले गीत थिजलेले ऐक जरा, वृंदावनाच्या भल्यासाठी.
धुळकटलेल्या घराच्या खिडक्यातले उसासे, उदास हसतील तुझ्यासाठी.
मलूल रातराणीचा गंध फिका, देईल जबानी माझ्या बेचैन संथरात्रींची !
कोनाडयातली कालबाह्य सतार, वाजवेल धून माझ्या विरहायुष्याची.
नागमोडी जिन्यावरच्या पाऊलखुणा, वदतील गाथा तुझ्या शोधाची.
नक्षीदार हृदयाचा कशिदा दिसेल, भिंतीवर तिथेच माझ्या तसबिरीशेजारी !
हलकेच फिरव कोमल कर, अभ्र्यात उशीच्या दफन केलेल्या अश्रुंवरी.
बिछान्यात नकोस झोपू, येतील भयाण स्वप्ने प्रतिक्षार्त भग्न प्रासादांची.
छताकडे नकोस पाहू, न जाणो उमटले असेल बिंब सताड उघड्या डोळ्यांचे.
झुंबरातल्या दिव्यांना विचार, अंधारकळांचे अस्तित्व होते किती काळाचे.
अर्धमिटलेल्या पुस्तकांच्या पानात भेटतील, ठसे थरथरत्या बोटांचे.
थबकू नकोस कुठेही, सरळ आत ये.. घरात ह्या मी असेन नसेन....
देव्हारा देईल साक्ष, समईत अल्वार विझलेल्या स्वप्नांच्या वातींची.
भिंतीत चिणलेले अबोल श्वास सांगतील गाथा माझ्या प्रेमवेदनेची.
मात्र रेलू नकोस सज्जात, पडुनी इथूनच संपवली मी यात्रा आर्त प्रतिक्षेची ....

- समीर गायकवाड

चक्रव्यूह..

कवितेनं उभं केलेलं हे प्रश्नचिन्ह अजूनही कपाळावर वागवतो मी.
कधी अस्वस्थ वाटलं तर आवर्जून तिला पाहतो, ऐकतो.
"आपण काहीच करू शकत नाही का ?"
हा प्रश्न पुन्हा पुन्हा
मस्तकावर घणांचे घाव घालू लागतो तेंव्हा 
सत्याचे नेमके सत्व शोधू पाहतो.


चक्रव्यूह रोजच्या घटनांचा आहे, भवतालाचा आहे, समाजाचा आहे
आणि देशाचाही आहे,
यात अडकण्याची इच्छा ज्या दिवशी दुबळी होते
तेंव्हा पुन्हा पुन्हा कवितेची शाई रक्तात उतरवतो.
शिथिल झालेल्या धमन्यातलं रक्त पेटवतो.
तरीही प्रश्न पडतो -
"माझ्यानंतरही चक्रव्यूह राहणार आहे, तर मी का लढू ?"

मग या प्रश्नाच्या चिरफाळया उडवत सत्वाने जगण्याचे इरादे बुलंद करतो.
आपल्यातलं पुरुषत्व म्हणजे तरी काय याचा शोध घेतो.

यशोदेचा कान्हा


आटला जरी मायेचा पान्हा, उदास न होई कान्हा  
देवकीचा खट्याळ तान्हा, जाई गोठ्यात पुन्हा
बिलगता गाईच्या कासा, पाहुनी चित्तचोरट्या    
लाडे म्हणतसे यशोदा, कान्हा तू असा रे कसा ?
सांग नंदाच्या सुता, माझा आटला का रे पान्हा?
कान्हा म्हणे यशोदेस, काय सांगू आता बहाणा

"माझ्या सगळ्याच ह्या माता, मला बघुनी फुटे त्यांनाच पान्हा ! !"

ऐकूनी त्याचे मधाळ बोल यशोदा म्हणे, 'माझा लाडाचा गं कान्हा !'

- समीर गायकवाड.

चैत्रातला वैशाख .....




पार्थिवाजवळच्या शोकमग्न आप्तेष्टांसारखी 

झाडे निश्चल उभी असतात तेंव्हा

जणू आईच्या कुशीत तोंड खुपसण्यासाठी 

सकल मेघ निघून गेलेले असतात.

निरभ्र झालेले आकाश एकटेच उरते,  

मुलाच्या अकाली मृत्यूनंतर थिजलेल्या बापासारखे !

एरव्ही उन्मुक्त वाहणारा वारा क्षितिजपार 

तोंड लपवून उभा असतो,

निष्पाप अनाथ मुलासारखा.

श्रद्धांजली वाहताना निशब्द झाल्यागत

गळपटलेली तमाम पानेफुले स्तब्ध असतात.

एरव्ही उनाडक्या करत फिरणारे पक्षी 

पंखाचे ओझे झाल्यामुळे की काय,

मोडकळीस आलेल्या घरटयांत,  

वाळक्या फांद्यात अचल असतात.

पाणी आटत आलेले शुष्कओले तळे,

बगळयांच्या विरहाश्रूंच्या शोधात खोल खोल जात राहते.

गरम फुफुटयाने भरलेला धगधगता अनवाणी रस्ता,

वाटसरूंच्या शोधात ऊनसावलीच्या बेटातून 

नागमोडी वळणे घेत धावत असतो.

विहिरीच्या तळाशी कोरडया होत चाललेल्या 

जडशीळ गाळाला

वळवाच्या मृगजळांचा स्फटिकाभास होत राहतो.

उन्हाने भोवळ येऊन पडलेल्या मयूरपंखी फुलपाखरांभोवती,

मुंग्यांची शिस्तबद्ध शोकसभा भरते.

सुकलेल्या फळांच्या नीरस टणक सालींना

पोखरून टोकरून मुंगळे हताश झालेले असतात.

भेगाळलेल्या देहानं उन्हे झेलणारी माती

चोळामोळा होऊन गेलेली असते,  

वार पडलेल्या गायीसारखी !

देहाची काहिली करणाऱ्या उन्हात सगळा आसमंत,

अंतर्बाह्य घुसमटून निघत असतो ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखा.

 

सकाळीच सुरु होणाऱ्या घामाच्या धारा मेंदूत झिरपून सांगत राहतात,

चैत्रात आलेला वैशाख वणवा असाच जाळत असतो !

 

समीर गायकवाड.

मरणोत्सुक...


मरणोत्सुक...
ते सोशल मीडिया युजर्स होते,
त्यांनी 'त्यांच्या' मरणाची मोठी प्रतिक्षा केली होती.
मोठाले लेख लिहून तयार ठेवले होते,
'त्यांच्या' कवितावर आपल्या कविता पाडल्या होत्या.
श्रद्धांजलीच्या यच्चयावत लंब्या चौड्या पोस्टसनी ते सुसज्ज होते....

ते व्हॉटसऍप युजर्स होते,
त्यांनाही 'त्यांच्या' मरणवृत्ताची खूप घाई झाली होती.
त्यांनी फोटो एडिट करून ठेवले होते,
अश्रू ढाळणाऱ्या स्मायली वाटच बघत होत्या,
'त्यांच्या' मरणाची बातमी आली रे आली की ते या पोस्ट्सचा तुफान मारा करणार होते.
किती प्रोफाइलला आणि कोणकोणत्या ग्रुप्सना 'त्यांच्या' श्रद्धांजलीचे कॉपी पेस्ट फॉरवर्ड कधी एकदा करेन असे त्यांना झाले होते...

मयूरपंखी

थोडंसं तारवटलेलं आभाळ काय आलंय, 
गवताच्या पिवळटलेल्या मलूल पात्यांनी माना वर केल्यात ! 
दिगंतापाशी वारयाने पाठ काय टेकलीय, 
सुकल्या पानांनी पानगळीच्या वाटा बदलल्यात.
अस्मान घनगर्द काय झालंय, 
घरट्याकडं चोचीत काड्या घेऊन सुगरणीच्या चकरा वाढल्यात. 
स्वस्थ मीनार कलते नभात दडले काय, 
काळजात मंदिराच्या कळसांच्या वेदना झंकारून आल्यात !
मेघांची घुम्या गर्दी काय झालीय, 
आसावल्या डोळ्यांत मायच्या आठवणी दाटून आल्यात. 
दूर रानात केकांचा आवाज काय आलाय, 
उदासवाण्या आसमंतास मयूरपंखी शब्दकळा पसरल्यात...

- समीर गायकवाड.

वसुंधरेच्या कविता...



वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष !
आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो
आणि त्याला साहित्य म्हणतो !
वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य !
आमची गीतेही खोटीच असतात.
खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात.

जसे की,
आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठांवर खेळतं !
पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते,
तिची भाषा असते मृदगंधाची !

मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्यासाठी तिष्टत असतो
अन चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर झेपावते,
वटवृक्षाचा कोळसा होतो पण मरतानाही तो गीत गातो.
त्याची भाषा असते मिठीची !

वसुंधरा जेंव्हा रुसते तेंव्हा
तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढगही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात.
वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात,
वृक्षांपाशी आपला निरोप देतात अन एके दिवशी संततधार बरसून तिला चिंब भिजवतात.
ते गीत असते मिलनाचे !

अप्सरेच्या तलम केसांत माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखली फुले मुकीच राहती
झाडांवरून गळून पडणारी कोमेजली फुले आनंदे गिरक्या घेत गीत गाती,
त्यात असते तत्व जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे !

असलं काही आपण रचू शकू,
तेंव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल,
गीत म्हणता येईल,
साहित्य म्हणता येईल.
तोवर आपला केवळ पोकळ शब्दखेळच चालू आहे असं म्हणायचे......

- समीर गायकवाड.

खलिल जिब्रानच्या कवितेवरून सुचलेलं..

सावली..

तिला मी शेवटचे कधी भेटलोय 
नेमके आठवत नाही
पण ती सांज खूपच मोठी होती, 

सरता सरली नाही.

काळजाचे डोळे करून 

वाट पाहणारं कुणी असेल का,
की आताही सांज झालीय 

म्हणून काय घरीच जायचं का ?

पूर्वी सांज होताच 

पाखरांचा चिवचिवाट असायचा
आता सूर्यास्त होता 

जीवाची पिसे छिलून निघतात
घरी जाताच 

डोळ्यातला संधीकाळ आरशात उतरतो.
एक सावली नकळत पाठीवर हात ठेवून जाते, 

मी तृप्त शहारतो !

- समीर गायकवाड 

~~~~~~~~~~~~~

ही कविता माझ्या आईसाठी लिहिलीय...

पुस्तकांचा अर्थ ....


तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मन लावून वाचलं
तरीही प्रेमात उत्तीर्ण झालो नाही
दरम्यान
पाठ्यक्रमाची क्रमिक पुस्तकेही कशीबशी चाळत गेलो,
खूपच रटाळ होती ती.
निकालात जेमतेम काठावर तगलो !
तरीही आयुष्याचा पट मात्र मखमली झालाय.

सोबतीला सहाध्यायी असणारे काही सखे खूप हुशार होते
मन लावून अभ्यास केला त्यांनी,
मास्तर म्हणायचे, 'बघ, असं पुस्तकी किड्यासारखं पानापानात शिरावं लागतं मग कुठं यश मिळतं !"
सर्व कसोट्यावर त्यांनी अफाट गुण मिळवले
त्यांच्या आयुष्याचा पट तर आता सोनेरी झालाय.

मात्र एक फरक झालाय
वयाची चाळीशी उलटल्यावरही त्यातले काही प्रेमाच्या शोधात आहेत,
काही आयुष्याचा अर्थ धुंडाळताहेत
त्यांचा तो सुवर्णपट आतून काटेरी असल्याचा शोध कालच लागलाय...

बरं झालं, तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मी पूर्वीच वाचलंय.
आता केवळ मध्यात आलोय पण तृप्तता शिगोशिग भरलीय !

दोस्तहो, पुस्तकं तर आयुष्य घडवतातच पण
जिती जागती माणसंही वाचता यायला हवीत
पुस्तकांचा अर्थ तेंव्हा कुठे उलगडत जातो !

- समीर गायकवाड

@पुस्तकदिनाच्या शुभेच्छा...

Tuesday 16 April 2019

प्रेम


मी अंगण होतो तू प्राजक्त हो, तू तुळस हो मी वृंदावन होतो
राखण घराची करताना गवाक्षातुन, घनश्याम बघ कसा डोकावतो!
मी माती होतो तू आभाळ हो, तू पाऊस हो मी वीज होतो,
पिऊनी मृदगंध फिरताना, परसात धुंदवारा बघ कसा गुणगुणतो !
मी बीज होतो तू अंकुर हो, तू तहान हो मी पाणी होतो,
मातीतून उगवलेलं स्वप्न हिरवं पाहताना, विधाता बघ कसा हरपतो !
मी वृक्ष होतो तू सावली हो, तू बासरी हो मी स्वर होतो
साजसंगीत आपल्या सुरांना चढवताना, निसर्ग बघ कसा डोलावतो  !
मी चांदणं होतो तू उजेड हो, तू वात हो मी ज्योती होतो.
अक्षरगाणं संसाराचं ऐकताना, तल्लीन होऊनि विठू बघ कसा हसतो !
मी कपाळ होतो तू गंध हो, तू तबक हो मी निरंजन होतो
चिरंतन आपुल्या अगाध प्रेमाचं, निहंता बघ कसं औक्षण करतो !
मी प्रयत्न होतो तू कर्तृत्व हो, तू नियती हो मी प्रारब्ध होतो 
जगणं जरी असलं कळसूत्री तरी, प्रेम मात्र आपण खरंखुरं करतो !   

- समीर गायकवाड.

Tuesday 9 April 2019

पानातलं मन


बैलं चालती जोडीनं, रान हासतं पानात 
वेली डुलती वारयावरी, पानं वाजवती शीळ 
वारा शिरतो पिकात, पीक हालतं वेगानं 
माती घुमते शिवारात, गाय हंबरे रानात 
मेघ उतरे डोंगरात, काळीज डोंगराचं होई 
डोळे वाहती भरून, पाऊस उतरतो रानात 
रान फुलते तरारून, फुलं उमलती देहात 
बैल चालती जोडीनं, पानं हासती मनात !

- समीर गायकवाड.

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...