Showing posts with label जीवनदायी. Show all posts
Showing posts with label जीवनदायी. Show all posts

Wednesday, 17 December 2025

पूर्वी एक पक्षी गझल गायचा..



पूर्वी एक पक्षी गझल गायचा, 
चार पाच झाडे ती ऐकत राहायची.

ज्यांच्या बद्दल बोललं जायचं, 
ती माणसंही मोजकीच असायची.

रात्र होताच फुल उमलायचे, 
चौदिशांना सुंगंधाची नजर असायची...

आताशा सांज विलक्षण मौन असते, 
वारा शोधित फिरतो झाडांना

विराणी खोल घुमते अंधारी, 
पक्षांची ती गझल आता कशी ऐकायची?

Thursday, 4 December 2025

बायको आधी गेली की पुरुष खचतात



उतारवयात बायको आधी गेली की पुरुष पुरते खचतात. 
ज्या पत्नीला मनसोक्त सहवास दिलेला नसतो
तिच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
हरेक क्षणासाठी पस्तावत राहतात.
तिच्याविषयी त्यांना उघड बोलताही येत नाही,
नुसते घुसमटत जातात
उदास कसनुसे बसून राहतात

खिन्न कोरडं हसतात, इकडं तिकडं शून्यात नजर लावून बसतात
तिच्या चीजवस्तूंना लपून छपून हाताळतात,
तासंतास न्याहाळतात
आस्तिक असले तर देव्हाऱ्यातून बाहेर डोकवताना
आसवले डोळे पुसतात
जीवनातल्या सगळ्या लढाया थांबवत जातात
एका जागी राहणं अधिक पसंत करतात!

Monday, 3 July 2023

बाप होणं सोपं आहे! पण..

 वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा.

आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो!
मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की
अपराधी भावना दाटून येते.
आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत
मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.

जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली
पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला.
धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि
मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो.
खरं तर आता कळतं की
वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती,
त्यातही कोमलता होती
पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो
तसं वडिलांचं झालेलं असतं.

मखमल

आज्जा सांगायचा, "कधी बी गावाकडं आलं की आधी मला भेटायचं.."

आता तो नाहीये, त्याला जाऊन दशके लोटलीत, तरीही तो भेटतच असतो!
गावाकडच्या रस्त्यांनी असलेल्या घनदाट झाडांच्या सावलीत
पांदीतल्या शांत शीतल आमराईत, गावंदरीच्या जुनेर घालमेलीत!

आज्जा भेटतो वेशीवरल्या मंदिराच्या गाभाऱ्यात, शिवंवरल्या पिंपळांच्या पारंब्यात
शेताच्या वाटंवरल्या डोहात अन् गव्हाच्या कोवळ्या लोंब्यांत

घरी गेलं की आज्जा दिसतो ढेलजंत, पडवीत तर कधी दिसतो अंगणात,
सारवण केलेल्या भिंतींना टेकून बसलेला तर कधी पोत्यांची चवड रचणारा

तुळशी वृंदावनात तेवणाऱ्या पणतीच्या मंद ज्योतीत त्याचा चेहरा तरळतो
कंदिलाची काच पुसताना, आरशात डोकावताना, विहिरीत उतरतानाही तो दिसतो

जुंधळ्याला लगडलेल्या चांदण्यांत तो चमकतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यांत पाझरतो
बांधावरल्या बोरीबाभळींच्या काट्यात वसतो, दावणीतल्या मूक वेदनांमध्ये झुरतो

आज्जा नांगराच्या फाळातून मातीत शिरतो, कंच पिकांतून उगवून येतो
हिरव्या पिवळ्या कोंबांच्या देठांत राहतो, कळ्यांची फुले होताना उमलून येतो

आज्जा नाही असा परीघ नाही,
आज्जा काळजात असतो आणि नातीला लावलेल्या काजळातही असतो
रातीला बाजंवर झोपी गेलं की बिलोरी चांदण्यांतुन खाली उतरतो,
अलगद गाल कुरवाळतो,
त्याच्या हातावरची मखमल गालावर ठेवून पहाटेस निघून जातो!

आज्जा पिढ्या न पिढ्या जिवंत असतो!
फक्त नावं बदलत जातात, माणूस तोच असतो!

- समीर गायकवाड

Wednesday, 16 November 2022

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे..



गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथेही आता रात्र झाली असेलमात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल
ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल

खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी

स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या

जीर्ण दगडी वाडे काही झुकले असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील

संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून

पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल
पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेल्या पिढीचा कासरा कोण ओढत असेल?

आठवणींनी कासावीस झालेले म्हातारे कुणीएक डोळे पुसत असतील नजर चुकवून
इथे उचक्या लागल्या बरोबर उमगते
याद कोणाची निघते अन् मनातल्या गोठ्यातली गाय रडते हंबरून
गाय रडते हंबरून.

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथलाच अंधार पहाटेस माझ्या उशाशी येऊन बसतो मायेची साय पांघरून...

- समीर गायकवाड

#sameerbapu #sameer_gaikwad

Monday, 12 September 2022

भादव्यातल्या उन्ही माळाच्या उष्ण काठी...

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
चिंचेच्या चिगोरी एक
निजे गाय थकलेली
पिऊनी साय सावली

डोळ्यात तिच्या झुरे
निष्पर्ण झाड शोकाचे
पक्षांना भूल स्वप्नांची
पंखांत ओल फुलांची!

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
सुकल्या खोडाच्या पोटी
भुकेले पिलू घरटयात  
घार दूर मेघांच्या अभ्ऱ्यात      

चोचीस होती भास
इवल्याशा घासांचे
ओशाळे बरड रान
गळता अखेरचे पान.

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी...


श्रावणातला पाऊस ओसरला की भाद्रपदातल्या उन्हांचे दिवस सुरु होतात. भाद्रपदातलं ऊन अंगाला चटके देतं. भरपूर पाऊस पडून गेलेला असल्याने मोकार उन्हे पडताच मातीतून धग बाहेर पडू लागते. मात्र सर्वच शेतशिवारात असं घडत नसतं. बरड मातीचा एखादा निष्पर्ण माळ असतो तिथे हे दृश्य दिसत नाही. अशा बांधांवर नुसती गरम हवा वाहत असते, रोरावणारा वारा बांधांच्या ऊष्ण काठांशी विसावतो आणि बांध अजून तापतात. अशा बांधावर एखादं चिंचेचं झाड असलं तर आसपासच्या शेतातली एखादी थकलेली भाकड गाय सावली पिऊन दिवसभर निव्वळ बसून राहते. सावली तिच्या आसपास मागेपुढे होत राहते. तिथेच शेजारी असणाऱ्या निष्पर्ण अशोकाच्या खोडातल्या घरट्यात जिवंत राहिलेलं एखादंच पिलू बसून असतं डोळे मिटल्या अवस्थेत. त्याला भास होत असतात आईने घास भरवल्याचे, त्याची चोच नकळत उघडझाप करत राहते मात्र त्याची आई दूर मेघांच्या अभ्र्यात विहरत असते. हे सगळं कमालीचं संथ आणि उदासवाणं असतं, परिणामी अशोकाचं अखेरचं पान गळून पडतं तेंव्हा ते बरड मातीचं रान विलक्षण ओशाळतं, कारण आपल्याही कुशीत हिरवे पिवळे कोंब उगवावेत झाडं मोठी व्हावीत त्यांना आभाळभर पाने फुले यावीत आणि त्यावर घरटी व्हावीत असं त्या मातीला वाटत असतं!

- समीर गायकवाड.  

Tuesday, 9 November 2021

दवात उमलत्या वेदना....



पावसाने गोठयातल्या चिखलात रुतलेलं
मथीचं आजारी अशक्त वासरू मेलं.

त्यालाही तिथंच पुरलंय जिथं
कधी काळी चित्रीला पुरलं होतं
आता चार दिवस उलटून गेलेत,
दरम्यान एकही रानफुल उमललं नाही.

मथीचं दूध आटलंय
दावणीला उभी असते ती
निर्विकारपणे
मात्र तिचे डोळे अखंड वाहतात
मथीचं ते शेवटचंच वेत होतं.

दुपारच्यानं आई गोठ्यात गेली की ती मथीपाशी बसते
मग आई आणि मथी दोघीही आसवत जातात
त्यांची काही दुःखे समान असावीत!

त्यांना रडताना पाहून
कडब्याच्या गंजीवर एकटीच बसलेली साळुंखी भावूक होते

घोटाभर चिखलात आडवी पडलेली
जुंधळयाची हिरवी सोनेरी ताटं
त्या दोघींच्या दुःखात सामील होतात.

सांजंला आई वृंदावनापाशी दिवा लावते तेंव्हा
दिव्याच्या केशरी पिवळ्या ज्योतीत
उद्याच्या आशा चौदिशेला तेवत राहतात

रातीला दावं मोकळं सोडलेली मथी
नकळत आईपाशी बाजेजवळ येऊन बसते
खरबरीत जिभेने तिचे हातपाय चाटत राहते.

मध्यानरातीला चान्न्या आईपाशी येतात
तिच्या भेगाळलेल्या पायापाशी झोपी जातात

त्या वक्ताला मथी, तिचे अशक्त वासरू आणि चित्री
सगळेक तिथे टक्क हजर असतात

मग ओलेती रात्र त्यांच्या डोळ्यांतून पाझरत राहते
पाय पोटात दुमडून
एकमेकींच्या पोटावर डोकं टेकून त्या अल्लाद निजतात
तेंव्हा कुठं झाडं, पानं. फुलं, पिकं, डोबी, गोठा, शेतशिवार डोळं मिटतं.

त्यांच्या समग्र वेदना सकाळच्या दवातून उमललेल्या असतात! 

- समीर गायकवाड

Saturday, 6 March 2021

मरणाऱ्याच्या पाठीमागे...

कुणी एक मरण पावल्याची बातमी कळताच 
अर्ध्याहून अधिकांना यात स्वारस्य असतं की 
काय झालं ? कशामुळे मरण आलं ?

वास्तवात हे कशासाठी जाणून घ्यायचं असतं ?
मरण कसं आलं हे उमगताच मृताबद्दलचे पूर्वानुग्रह कच्चेपक्के करायचे असतात
व्यक्ती मरण पावल्यावर श्रद्धांजल्या वाहताना ते कामी येतात !

एक सांगू का ? 
माणूस मेला बात खतम. 
मागच्या श्रद्धांजल्या सब झूठ

एक शिरस्ता म्हणून जगाप्रमाणेच मी ही वाहतो श्रद्धांजली
पुढच्याच क्षणाला दुसऱ्या एकाला देतो शुभेच्छा
सारंच कोरडं... 

तरी एक बरे झाले 
की इमोज्या आल्या. चार शब्द टायपायचे कष्ट वाचले
तसेही श्रद्धांजली, शुभेच्छाही कॉपीपेस्टेड असतात तरी कुणाला कळते काय ?

अपवादाची बेसरबिंदी सोडता  
तिथं सारा समांतर शुष्क भावबाजार
स्वस्त झाल्या भावना नि फुटकळ झाले प्रकटन विचार ... 

लोक वदतात बद्धकोष्ठी भाव आणून, 
कुणी म्हणतो मोठी पोकळी निर्माण झाली. अपरिमित हानी झाली 
अमुक एक पोरकं झालं. वाणी खुंटली. स्तब्ध थिजून अबोल झालो...

खरं तर सर्वांनाच ठाऊक असतं की 
घंटा फरक कुणालाच पडलेला नसतो
ज्याचं रक्ताचं गेलेलं असतं त्याचा तरी शोक किती खरा असतो ?
 
किती एक बोल फुकाचे 
खरे तर हे नाममात्र दाखले सुखदुःखात सामील असल्याचे
भीती असते भावनेच्या प्रवाहात नसलो तर संवेदनहीन ठरण्याची  

वास्तवात इथल्या रोजच्या मरणांचे दुःख तरी किती कुणी आणि का करावे ?
बरे झाले दोस्त हो 
मरणाऱ्याला कळत नसते, जग पाठीमागे त्याच्याबद्दल काय बोलत असते !

- समीर गायकवाड

Monday, 22 February 2021

भूक

स्वप्नात काहीबाही येतं.
बालपणी शाळेबाहेर कुष्ठरोगी भीक मागत बसलेला असायचा.
तेलकट चेहऱ्याचा, कानाच्या पाळ्या जाड झालेला
नाकाचा सांडगा झालेला, गालाची हाडे वर आलेला
डोईचे केस आणि डोळ्याच्या पापण्या झडलेला, भुवया विरळ झालेला
कालच्या स्वप्नात हाती तेच काळपटलेलं जर्मनचं वाडगं घेऊन फिरत होता
फिरून फिरून त्याच्या पावलांत बैलाचे खुर फुटलेले
अन्नाच्या शोधात तो वणवण भटकत होता
खूप काळ फिरत होता तो
त्याचं शल्य त्याच्या डोळ्यात स्पष्ट तरळत होतं
बराच वेळ असाच निशब्द गेला.
काही क्षणासाठी डोळ्यापुढे अंधार झाला आणि
तो पुन्हा दिसला..

Sunday, 14 February 2021

रविवारची दुपार

आणखी एक रविवारची दुपार आलीय
सवयीने तू नाक्याखालच्या ब्रिजपाशी उभी असशील
सुसाट वाहने येत जात असतील सराईतपणे  
झाडं असतील धुराने धुळीने पेंगुळलेली
कडेला पोलीस उभा असेल थोडासा विमनस्क थोडासा बेगुमान

आज शोभा-डेंनी टाईम्समध्ये लिहिलंय की, राहिला नाही
गोवा पहिल्यासारखा
समुद्रतट तसेच आहेत मात्र रेस्तरॉ, गल्ल्या, माणसं, खानपान सगळं बदललंय म्हणे
राहिलंय काय आता पहिल्यासारखं
कुठल्याशा पोर्टलवर आज लाईव्ह लिलाव आहे मुलीचा
पूर्वीही घडत नव्हतं का असंच काहीसं ?

Wednesday, 10 February 2021

काळजाची बाभळ ..


कालच्या पावसाची नाही जमली वेचणी
स्वप्नांची झाली छाटणी

वाहून गेला जुंधळा, कांदा कोवळा
थरारल्या साक्षीच्या कातरवेळा

विस्कटल्या तुरी
पानगळल्या बोरी.

फड सैरभैर ऊसाचा
शिग तरंगला कडब्याचा.

पाखरांची शाळा बांधावर
घरट्याचं मढं झाडावर

मोडल्या माना वृक्षांच्या
विझल्या वाती दिव्यांच्या

आता पुन्हा रिती दावण
छळती तिचे जुनेच व्रण.

गोठ्याच्या छताला
आता टांगतो भविष्याला

तरीही पावसाचे या नुठले वळ
काळजाची झाली बाभळ....

- समीर गायकवाड

Thursday, 10 September 2020

इथल्या आकाशात आता दूरवर निरभ्र दिसत नाही...

आपण दोघांनी अश्मयुगात जन्म घेतला होता
तेंव्हा आपण निसर्गाच्या कुशीत वाढलो, जगलो, मेलो...
जगण्याच्या उर्मीने पुन्हा जन्मलो आपण ताम्रयुगात
तेंव्हा काही संकेत होते जगण्याचे, मरण्याचे.
त्यांचं पालन आपण केलं. बरोबर ना !

श्वासाच्या असोशीने आता आपण पुन्हा जन्मलोय
मात्र या भौतिक सुखसागरात न तू ओळखलंस मला नि मी तुला.
शोधात आपल्याच आपण दोघंही एक काम करतोय
गुगल सर्चमध्ये जात, धर्म, आडनाव, विचारधारा काहीही टाईप करतोय.
उघडया नागडया, क्रूर, बीभत्स, अश्लील वा हिंसक तसबिरी शोधतोय.
खऱ्या खोट्या बातम्यांच्या महापुरात शोधून पहातोय.
खरे तर एकजीवच आहोत आपण तरीही एकेमकां सापडत नाही.
माणूस असण्याचं सत्व जे आपण गमावून बसलॊत.
आता पुन्हा कधी नव्याने कधी जन्म घेतला तर
गाव, शहर, प्रांत, देश, जातधर्म, वर्ण, कुठल्याच सीमा नकोत मला.
सांग काय वाटतंय तुला ?

इथल्या आकाशात आता दूरवर निरभ्र दिसत नाही
तुझ्याही मनात मळभ दाटून आलेय का ?
चालताना रुतणार नाही रस्ता असा उरला नाही
जखमा तुझ्याही पावलांना झाल्यात का ?
जायचे आता कुठे तेही काही केल्या उमगत नाही
गोंधळल्या दिशांचा भास तुलाही झालाय का ?

- समीर गायकवाड

Thursday, 8 August 2019

पूर


पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शिरलंय गावाबाहेरच्या उपेक्षित वस्त्याही पाण्यात बुडाल्यात आणि गावातल्या चिरेबंदी वाड्यांच्या ढेलजाही जलमय झाल्यात. मंदिराच्या कळसाभवती आणि मास्जिदीच्या मीनारांभवती घुमणारे पक्षी कधीच उडून गेलेत. गणेशपेठ, भीमनगर आणि मोमीनगल्लीही पाण्यात बुडून गेलीय. पावसाने भेदाभेद केलेला नाही.... हाहाकारातून वाचण्यासाठी वडाच्या फांद्यांना शेजारच्या पिंपळाचा आधार आहे. एकाच झाडावर असणाऱ्या उध्वस्त घरट्यातले भिन्नवर्गीय पक्षी ओलेत्या पंखांनी शेजारी बसून आहेत. पाऊस उघडला की पुन्हा एकमेकाशेजारी ते आपलं घरटं नव्याने बांधणार आहेत. एव्हढेच नव्हे तर जमिनीच्या हिश्शावरून वाद असलेल्या एकाच बांधावरल्या बोरींनी बाभळींना मदतीचा शब्द दिलाय ! आपण तर प्रगत जीव आहोत चला सर्वांना मदतीचा हात देऊया... - समीर गायकवाड.

Friday, 31 May 2019

हवीहवीशी भेट...


पहाटेस दूर नदी किनाऱ्यावरून वाहत येणारा
तिचा गंध मला ओढून नेतो.
पाण्याने तासलेले दगड
वाटेतल्या दऱ्यांमधले कातळलेले पत्थर
किनाऱ्यावरची हिरवी शेते
रंगीबेरंगी फुलं पार करून
त्याच्यासोबत तळाशी खेचून नेतो.

तिथे ‘ती’ रोजच माझी प्रतिक्षा करत असते
मला पाहून तिच्या चेहऱ्यावर
प्रसन्नतेची कारंजी फुलतात!
तिच्या देहाला लगटून मी खोलवर फिरत राहतो.
तिच्या बालपणीची खेळणी,
तिच्या संग्राह्य वस्तू ती आनंदाने दाखवत राहते
किशोरवयात दुरावलेल्या
आई वडिलांच्या तसबिरी दाखवताना ती हळवी होते.
कळत्या वयाआधी वाट्यास आलेल्या
पहाडकष्टांची कथा ऐकवते
नियतीने घेतलेले दंशविखार दाखवते.
तिच्या तारुण्यातली पंख विस्कटलेली फुलपाखरं
पाहताना जीव उस्मरून जातो
फुटलेल्या स्वप्नांच्या तडे गेलेल्या फ्रेम्स दाखवताना
तिच्या डोळ्यात चमक येते.
तिच्याकडे काही फोटोही आहेत
तिच्या लग्नाचे, नानाविध घटनांचे...

श्वेतधवल फोटोंचा जुना अल्बम दाखवताना
ती हरखून जाते.
लग्नानंतरच्या, संसाराच्या निष्ठुर आठवणी
तिच्या डोळ्यातून नकळत वाहत राहतात
मुलं वाढवताना झालेली उपासमार,
इच्छांचा कोंडमारा त्यातून स्त्रवत जातो.
तिचं सगळं विश्व दाखवताना ती हरखून गेलेली असते
आयुष्य संपून अखेरीस रिते राहिलेले तिचे हात
आता मला दिवसागणिक अधिकच मखमली वाटतो
तिच्या स्नेहार्द्र मुलायम कायेचा स्पर्श
जो माझी जगण्याची लढाई सुखद करतो..

तिच्यासोबतचे हे जादुई क्षण मी रोज जगतो
दूर पाण्याखाली असताना
तिच्या गर्भात असल्याची पुनरानुभुती घेतो..
ती इहलोकातून गेल्यापासून
त्या नदीचं पात्र कोरडं पडलंय
पण तरीदेखील रोज पहाटे येणारा
तिचा हवाहवासा परिमळ
मला खेचून पुन्हा पुन्हा तिथेच नेतो.
तेव्हा मात्र त्याच नदीचं पात्र
पाण्याने काठोकाठ भरलेलं असतं
ते पाणी तिच्या अश्रूंच्या थेंबातून पाझरलेलं असतं

आईशी माझी रोज अशीच भेट होत असते,
जी माझी उमेद बनून राहते...

(ब्रूस स्पिरिंग्टनच्या ‘द रिव्हर’ कवितेवरून सुचलेली रचना)

सावली


उन्हे फार कडक होती,
सकाळपासून तुझ्या घराची दारे खिडक्या बंद होती
आता सूर्य मावळला असेल तर
जरा शयनकक्षाच्या खिडकीतून बाहेर पहा
तिथल्या पारिजातकाच्या झाडाजवळ
माझी सावली विसरली आहे
तुला पाहून तिच्यात फुलांचा दरवळ तरी येईल !


- समीर गायकवाड 

Saturday, 25 May 2019

प्राजक्त


खूप प्रयत्न करूनही ओठातून शब्द फुटले नाहीत
घायाळ मौनाचे अर्थ तिला कधी उमजलेच नाहीत
काळीज पोखरणाऱ्या निशब्दतेचीही एक भाषा असते
जी शब्दांच्या कुबड्यांसाठी कधी मोहताज नसते...

तसं तर ती ही अर्धोन्मिलित ओठांनी पुटपुटली होती काही तरी
पण मातीत रुतलेल्या तिच्या अंगठ्यावरच माझी नजर होती
त्यामुळं तिचं म्हणणं कधी कळलंच नाही...
आता काही दशकानंतर तिला भेटताना
थरथरतात का अजूनही ओठ तिचे, शोधायचं होतं मला
पण पाहताच मला नजर तिने लपवली
अंगठ्यानं ती उकरत होती माती, हे पाहून मात्र हायसं वाटलं !

आता भर उन्हात उभं असताना तिची सावली आवाज देत शोधते मला
भूतकाळाच्या उंबरठ्यातून तिच्या हाका ऐकू येत नाहीत
दाराबाहेरचा पारिजातक मात्र शोषून घेतो तिच्या सात्विक हाका
सकाळ होताच तिच्या हाकांचा प्रतिध्वनी ऐकवण्यास झेपावतात फुलं अंगावर
लोक म्हणतात, अंगणात प्राजक्त फुलांचा सडा किती बहारदार पडलाय !


- समीर गायकवाड 

Wednesday, 15 May 2019

बहर


अलीकडे रोज सकाळी न चुकता मी रेडीओ लावतो.
खरं तर मी ऐकत काहीच नसतो
आठवणींच्या तरंगात जगत असतो.
हातून निसटलेला गतकाळाचा पारा वेचण्याचा तो एक अधुरा प्रयत्न असतो.
भूतकाळात वारंवार डोकावं नये असं म्हणतात
पण मी डोकावतो, जगतो
साथसोबत सोडून गेलेल्या माणसांचं सान्निध्य अनुभवतो
माझ्याच चुकांचा आलेख नव्याने मांडतो
येणाऱ्या काळाचं गणित शिकतो....
आजकाल मी वर्तमानाला न साजेसं जगतोय
कारण मर्जीप्रमाणे वागतोय...
कुणी कालबाह्यतेचा ठपका ठेवला तरी हरकत नाही, दुःख नाही.
जगाला आवडेल असं आयुष्य आता मी जगत नाही.
अंगणात दफन झालेले कधी काळचे माझेच उसासे आता आनंदी भासतात मला..
पारिजातक आता अधून मधूनच फुलतो पण मी रोजच बहरलेला असतो...


- समीर गायकवाड 

Wednesday, 8 May 2019

माती

काळ्या मातीत रुजलेल्या खोल मुळांसारखीच आई असते.
सारखी ती दबून राहते, तरीही मातीला खोल खोल भिडत राहते.
हजार फुटवे उगवतात तिच्या देहावर आणि ती झाड जगवत राहते.
अंधारल्या जगातली मुळं अनभिज्ञ असतात मातीवरच्या जगाला...
तर ऊन, वारा, पाऊस झेलणारा झाडाचा बुंधा हा बापासारखा असतो. 
मातीतल्या मुळांना घट्ट धरून असतो.
जणू मुळांच्या अस्तित्वात तो एकजीव होऊन गेलेला असतो.
अंगाखांद्यावरती फांद्यांचे ओझे समर्थपणे पेलत राहतो.
कधी कधी कुऱ्हाडीचे घावही सोसतो,
अर्ध्यातून कापला जातो तरीही हिरवा कोंब मस्तकावर नव्याने उगवत राहतो...
झाडावरची पानं, फुलं मात्र खुशीनं डवरत असतात,
वारयावरती डुलत असतात, सूर्यप्रकाशात हसत असतात.
काही फुलं गळून पडतात तर काहींची फळं होतात ;
फळांच्या बिया फिरून पुन्हा मातीमध्ये रुजतात...


आणि नव्याने सुरु होतो तटतटलेल्या मुळांचा आणि टणक होत चाललेल्या कोवळ्या झाडाचा प्रवास...


- समीर.

एक ऋतू काय बदलला!


ऊन थोडंसं निष्प्रभ काय झाले, रंग फुलांचे फिके झाले  
येता राज्य उदास मेघांचे, घर सावलीने ही सोडले!

सोने धुंद बहाव्याने उधळले, पक्षी तरीही न परतले
होताच दोनेक पाऊस, झाडांनी करार हिरवाईशी केले
 
'यंदा उन्ह जरा जास्त होतं, हे आता नित्याचेच झाले’
असं म्हणत गवताच्या पात्यांनी, वसे तलवारीचे घेतले

रस्त्यातून थोडं पाणी वाहताच, भाव कागदी नावांना आले,
कलत्या सांजेला झुरतात आता, उन्हाच्या कवडशांचे प्याले
   
रंगला नच जरी पाऊस पुरता, तरी शब्दांनी साज ल्याले
रात्रीस घनगर्द आमराईत, आभाळ तारकांनी लगडले

तुझ्या कमनीय आरस्पानी देहात, टिपूर चांदणे चमकले
एक ऋतू काय बदलला, रंग माझ्या कवितेने बदलले!!

पहिले उडाण ..



पंखी तयांच्या बळ लाभू दे, आकाश कवेत येऊ दे 

गगन भरारी उंच त्यांची, विश्वाला कौतुके पाहू दे
वाऱ्याच्या झुळूकेवर तयांना, गाणी वेगाची गाऊ दे
गिरक्या घेताना आकाशी, उर्मी चेतनेची लाभू दे
गीत नव्या पंखांचे गाताना, चोचीत गोडवा येऊ दे  

घास प्रेमाचा भरताना, तृणात अमृत झिरपू दे
ऊन,वारा, पाऊस,सावली यांचे भान तयांना येऊ दे
मार्ग न चुको तयांचा, पथदर्शी या दिशांना होऊ दे
घरट्याकडे परतताना कृपा त्यांच्यावर राहू दे
पहिले उडाण त्यांचे, तुझ्या नावाचे असू दे !!

- समीर गायकवाड

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...