Friday 31 May 2019
पत्र
नक्षीदार लखोटयातून दाखल झालेलं.
पत्र 'वाचता'च अनेक क्षण, अनेक माणसं, अनेक आठवणी भवताली गोळा झालेल्या.
स्वच्छ शुभ्र रेघाळया कोऱ्या कागदाचं.
विना मजकुराचं
मागेपुढे कुठेच काहीच न लिहिलेलं पत्र...
तरीही मी ओळखलंच.
तिच्या हाताचा तो परिचित गंध, कागदाला जो लाभलेला !...
Saturday 25 May 2019
प्राजक्त
खूप प्रयत्न करूनही ओठातून शब्द फुटले नाहीत
घायाळ मौनाचे अर्थ तिला कधी उमजलेच नाहीत
काळीज पोखरणाऱ्या निशब्दतेचीही एक भाषा असते
जी शब्दांच्या कुबड्यांसाठी कधी मोहताज नसते...
तसं तर ती ही अर्धोन्मिलित ओठांनी पुटपुटली होती काही तरी
पण मातीत रुतलेल्या तिच्या अंगठ्यावरच माझी नजर होती
त्यामुळं तिचं म्हणणं कधी कळलंच नाही...
आता काही दशकानंतर तिला भेटताना
थरथरतात का अजूनही ओठ तिचे, शोधायचं होतं मला
पण पाहताच मला नजर तिने लपवली
अंगठ्यानं ती उकरत होती माती, हे पाहून मात्र हायसं वाटलं !
आता भर उन्हात उभं असताना तिची सावली आवाज देत शोधते मला
भूतकाळाच्या उंबरठ्यातून तिच्या हाका ऐकू येत नाहीत
दाराबाहेरचा पारिजातक मात्र शोषून घेतो तिच्या सात्विक हाका
सकाळ होताच तिच्या हाकांचा प्रतिध्वनी ऐकवण्यास झेपावतात फुलं अंगावर
लोक म्हणतात, अंगणात प्राजक्त फुलांचा सडा किती बहारदार पडलाय !
Tuesday 21 May 2019
दिवाली
Wednesday 15 May 2019
बहर
अलीकडे रोज सकाळी न चुकता मी रेडीओ लावतो.
खरं तर मी ऐकत काहीच नसतो
आठवणींच्या तरंगात जगत असतो.
हातून निसटलेला गतकाळाचा पारा वेचण्याचा तो एक अधुरा प्रयत्न असतो.
भूतकाळात वारंवार डोकावं नये असं म्हणतात
पण मी डोकावतो, जगतो
साथसोबत सोडून गेलेल्या माणसांचं सान्निध्य अनुभवतो
माझ्याच चुकांचा आलेख नव्याने मांडतो
येणाऱ्या काळाचं गणित शिकतो....
आजकाल मी वर्तमानाला न साजेसं जगतोय
कारण मर्जीप्रमाणे वागतोय...
कुणी कालबाह्यतेचा ठपका ठेवला तरी हरकत नाही, दुःख नाही.
जगाला आवडेल असं आयुष्य आता मी जगत नाही.
अंगणात दफन झालेले कधी काळचे माझेच उसासे आता आनंदी भासतात मला..
पारिजातक आता अधून मधूनच फुलतो पण मी रोजच बहरलेला असतो...
Wednesday 8 May 2019
माती
सारखी ती दबून राहते, तरीही मातीला खोल खोल भिडत राहते.
हजार फुटवे उगवतात तिच्या देहावर आणि ती झाड जगवत राहते.
अंधारल्या जगातली मुळं अनभिज्ञ असतात मातीवरच्या जगाला...
तर ऊन, वारा, पाऊस झेलणारा झाडाचा बुंधा हा बापासारखा असतो.
मातीतल्या मुळांना घट्ट धरून असतो.
जणू मुळांच्या अस्तित्वात तो एकजीव होऊन गेलेला असतो.
अंगाखांद्यावरती फांद्यांचे ओझे समर्थपणे पेलत राहतो.
कधी कधी कुऱ्हाडीचे घावही सोसतो,
अर्ध्यातून कापला जातो तरीही हिरवा कोंब मस्तकावर नव्याने उगवत राहतो...
झाडावरची पानं, फुलं मात्र खुशीनं डवरत असतात,
वारयावरती डुलत असतात, सूर्यप्रकाशात हसत असतात.
काही फुलं गळून पडतात तर काहींची फळं होतात ;
फळांच्या बिया फिरून पुन्हा मातीमध्ये रुजतात...
वियोग २
केकताडात वाढलेला चाफा तेंव्हा पाकळ्यातून हसतो !
गहिवर तिच्या आठवणींचा वातीत समईच्या पाझरतो
देव्हाऱ्यातला देवही तेंव्हा निर्माल्यात डोळे लपवतो !
चाहूल तिच्या येण्याची घेऊन वारा घरभर हुंदडतो
जीर्ण झालेल्या खिडक्यात तेंव्हा बर्फ नजरेचा होतो !
कढ तिच्या वेदनास्मृतीचे पिऊनि अस्तास सूर्य जातो,
स्वप्नातल्या गावात पाऊस वियोगाश्रूंचा कोसळतो.....
दरवळ ...
पडद्याआड तुझेच ऊर धपापले असणार !
उंबरठयावरची रांगोळी सांगून गेली मजला,
येण्याची माझ्या, प्रतिक्षा अनंत झाली असणार !
मी असाच आलो अवचित वारा जसा पदराशी खेळाया
तू होती भिनवित आठवणी ऐन्यात हळदीच्या राया
येताच घरात मी, शहारल्या माळावरच्या मुग्ध आमराया !
चल पसरू दे दरवळ, वारा गंधवेडा आसुसला असणार !
- समीर गायकवाड.
रंग...
ऊन थोडंसं निष्प्रभ काय झालं, रंग फुलांचे फिके झाले
येता राज्य उदास मेघांचे, घर सावलीने ही सोडले !
सोनं धुंद बहाव्याने उधळलं, पक्षी तरी ही न परतले
होताच दोनेक पाऊस, झाडांनी करार हिरवाईशी केले
'यंदा उन्ह जरा जास्त होतं, हे आता नित्याचेच झाले'
असं म्हणत गवताच्या पात्यांनी, वसे तलवारीचे घेतले
रस्त्यातून थोडं पाणी वाहताच, भाव कागदी नावांना आले,
कलत्या दिवसापाशी आता झुरतात, उन्हाच्या कवडशांचे प्याले
रंगला नच जरी पाऊस पुरता, तरी शब्दांनी साज ल्याले
रात्रीस गर्द आमराईच्या रानात, अंधारले आकाश लगडले
तुझ्या कमनीय आरस्पानी देहात, टिपूर चांदणे चमकले
एक ऋतू काय बदलला, रंग माझ्या कवितेने बदलले !!
- समीर गायकवाड
पहिला पाऊस..
ढगांच्या रांगांनी मग तांबडफुटी अडवली.
एकामागून एक काळ्या ढगांनी अस्मानी डाव रंगवले,
मुसळधार, धुव्वादार, रिपरिप,जोरदार, संततधार असे अनेक डाव झाले.
या वर्षी आभाळातले पैलवान गडी पहिल्यांदाच रंगात आलेत.
आमच्याकडे मस्त कोसळणारा पाऊस घेऊन आलेत.
काळ्या मातीच्या भेटीला तिचे तहानलेले थेंब आलेत,
टपोरया थेंबाचे मेघदूत आज मातीत मनसोक्त न्हालेत....
हा पाऊस पाहुणा आता मुक्कामी रहावा म्हणून आमचे प्राण कंठाशी आलेत....
कोमा
चंद्रभेसूर अंधार दुःखवेडया डोहाच्या
ओंजळीत हमसून हमसून रडला.
उध्वस्त घरट्यातील दिशाहीन पक्षी
रात्रभारित पश्चिमेच्या आभाळ निळाईत विरले.
घुबडघुमटी देवळाच्या शुष्क दीपमाळा
मेघांच्या धुव्वाधार मिठीत हळुवार निमाल्या.
अजान पुकारताना मस्जिदीचे गोलघुमट
अंतराळाला सवाल करून मोकळे झाले.
फुलांच्या गंधरुसव्या कळ्यांनी
देठाशीच कोंडून घेतले.
भिंतीवरच्या घडयाळातल्या टोकदार लंबकाने
अखेरचे उष्म आचके दिले.
देव्हाऱ्यातल्या समईने हलकेच फुलवातींना
मागे ओढून पोटात पाय दुमडले.
गुलमोहरी वळणवाटेवरच्या जुन्या शिळांना
दाटून गच्च उमाळे आले.
अंगणातले प्रकाशाचे प्रतिबिंब रात्रीत
गुंतताना निशाचराच्या रक्ताक्षात विलीन झाले.
माळावरच्या सावल्यांनी प्राक्तनवृक्षाचे मलिन
खोड कापताना मुळ्यांच्या अंताशी तुझा शोध सुरु केला.....
पण तू परत आली नाहीस...
त्या दिवसापासून उफाणलेल्या वाऱ्याने त्याचे घर वर्ज्य केले,
जाईच्या पाकळ्यांनी भ्रमरांशी अबोला धरला,
समग्र सांजा शिशिरातुर पानगळीत रत झाल्या,
प्रकाशगोलाच्या ओढीने ग्रासलेल्या त्याच्या देहाच्या
वेदीवरती क्षितिजाच्या यमसल्लेखनेच्या वेणा सुरु झाल्या !
अन,
पानातल्या स्वरबंदिस्त वेणूनादाने गदगदलेल्या झाडात हलकेच गोंदवून घेतले.\
जेंव्हा कधीही अवचित येतो स्वरगंधित पानांचा सळसळणारा आवाज
तो ओळखतो की
आता तुझ्या परतण्याचा भास होणार आहे.
त्याच्या थिजलेल्या प्रतिक्षारत डोळ्याच्या बाहुलीत हलकेच तुझे प्रतिबिंब तरळते,
इस्पितळातल्या आयसीयुत तो पडून आहे दोन दशकापासून
डोळ्यावर टॉर्चचा झोत टाकताच होते त्याच्या बुब्बुळांची हालचाल
डॉक्टर म्हणतात, "स्टील होप्स आहेत, ही रिस्पॉन्डस,
त्याच्या डोळ्यात लाईफसाईन आहे, हि मे रिकव्हर फ्रॉम कोमा !"
खरे तर तेंव्हा त्याच्या डोळ्यात तू तरळून गेलेली असतेस अन
त्याच्या कानात स्वरबंदिस्त पानांचा अल्वार वेणूनाद होऊन गेलेला असतो.
- समीर गायकवाड.
पहिले उडाण ..
पंखी तयांच्या बळ लाभू दे, आकाश कवेत येऊ दे
वारयाच्या झुळूकेवर तयांना, गाणी वेगाची गाऊ दे
गिरक्या घेताना आकाशी, उर्मी चेतनेची लाभू दे
गीत नव्या पंखांचे गाताना, चोचीत गोडवा येऊ दे
ऊन,वारा, पाऊस,सावली यांचे भान तयांना येऊ दे
मार्ग न चुको तयांचा, पथदर्शी या दिशांना होऊ दे
घरट्याकडे परतताना कृपा त्यांच्यावर राहू दे
पहिले उडाण त्यांचे, तुझ्या नावाचे असू दे !!
- समीर गायकवाड
अंधार...
पणती सगळं त्याने टाकून दिलंय.
भव्य एलईडीने आता त्याचे घर सजले आहे.
दिवाणखाना तर प्रेक्षणीय झालाय,
उंची सोफा अन मखमली जाजम.
तलम पडदे, देखणी रंगसंगती,
किंमती साजोसामान सारं कसं आखीव रेखीव.
प्रशस्त किचन आहे, ऐसपैस बेडरूम्स आहेत.
हॉस्टेलवर गेलेल्या एकुलत्या मुलाची
चिल्ड्रनरूमही मस्त ठेवली आहे.
बाल्कनीत लाल पिवळ्या फुलांची नाजूक रोपे आहेत,
सज्जे, जिने पेंटींग्जने डवरले आहेत.
गुळगुळीत मार्बल्समध्ये लख्ख प्रतिबिंब दिसतं.
अंगणातल्या लॉनमध्ये छोटासा झुला आहे,
मोकळाच असतो तो.
कंपाउंड वॉलला हिरव्यापिवळ्या वेली लगटून आहेत.
बंद पडलेली जुनी मोटारसायकल
मागे आऊटहाऊसपाशी धूळ खात पडून आहे.
आऊटहाऊसमधल्या अडगळीच्या खोलीत
जुन्या ट्रंकेत आईवडिलांच्या तसबिरीही आहेत.
काही महिन्यापूर्वी त्यांची एकापाठोपाठ एक एक्झिट
याच खोलीतून झालेली.
या नभाचे हे दान ...
राव्यांच्या गीतांनी आमराईस रेशीमविळखे घातले.
झाडे कुसुंबी लज्जित शाममेघांच्या मिठीत विसावली,
मावळत्या नभांस तुझ्या दृष्टीची दिवेलागण झाली.
बांधावरच्या वृक्षांची साल हळदओल्या पालवीत नाहली,
प्राणपाखरांना इंद्रधनुष्यी पुष्पगंधाची रानभूल पडली.
पोटरयात पिकांच्या तुझी चाहुल हलकेच तटतटली,
उफाणल्या शिवाराच्या देहात तालवीणा तुझी झंकारली.
सुरुवात ...
अस्तित्वाच्या हुंकाराचे झेंडे अजूनही पाठमोरे आहेत,
दैन्याचे खंजीर अजूनही छातीत शिरण्या सज्ज आहेत.
स्वातंत्र्याच्या गप्पा आता शिळोप्याच्या झाल्या आहेत,
स्वप्नांच्या भाकडकथा अजून किती काळ ऐकायच्या आहेत ?
आश्वासनाची कल्हई लावलेले चेहरे झेंडे फडकवत राहतात.बुद्धीची झिलई उतरलेले लोक तरीही त्यांना भुलतच राहतात,
स्वातंत्र्योत्तर सात दशकात पाणी,रस्ते,वीजच ते देत आहेत.
सुरक्षा, शिक्षण, समानता अजून उंबरठ्याबाहेरच उभे आहेत,
माळराने
वाऱ्यांच्या तप्त झुळुकांच्या शिरी, दगडफुलांचे नाचरे गंध
काटेरी सावल्यात बाभळीच्या, सरडयांचे डौलदार डाव
विखुरलेल्या मातीच्या अंगाशी, झोंबित उन्हाचे पडाव
आभाळाच्या लख्ख आरशात, निरखे माळरानीचे विहंग
कोरडयाच ओढयात, टक्क शिळा पडुनी असत अभंग
बांधावरच्या सावल्यांना असे,नवरंगी फुलपाखरांचे उधाण
देठात पानाच्या सजविते स्वप्न, वाकलेले जराजीर्ण झाड
किरमिजी रुक्ष कायेत गवताच्या, जरी आचके देतसे ओल
मातीच्या कुशीत खोल चाले, मुळांचे हळुवार आचमन.
अंकुरती तरीही नवे कोंब, झाडांच्या निष्पर्ण शेंडयावर
चालताना माळरानी थांबती पावले, जरी उन्हे डोक्यावर
शीळ घुमे कानी जरी दिसत नसे उनाड पारवा दूर दूरवर
मातीच्या नभी प्रेमाचे विजळलेले रूप, म्हणजे माळरान
हिरवाईचे किनखापी गालिचे उसवुनी, जे ल्येई अंगी उजाड
अखेरच्या चिवट श्वासापर्यंत तग धरुनी हरवी ऊन नभास
असती जरी माळराने भकास, तरी कधी न गमती उदास !
- समीर गायकवाड.
सुभग
तरंगतात खुणा जन्मदात्यांच्या भिंतीवरल्या आत माजघरात
अंगाई गीत ओसरीवरच्या पिंपळपानांचे रंगते आर्त स्वरात
कातळ अंधाराचे कुरतडते अलगद कातरवेळेची ओढाळ खार
भरकटलेलं हरिण मनीचे जंगलात मौनाच्या घुसमटते आरपार
साली आठवणींच्या सोलत तिष्टतो कोनाड्यात उद्याचा प्रहर
नभात दूर अंधारल्या ओढतो चिलीम दुःखाची वृद्ध एकाकी मेघ
स्फटिक धवल निर्झरात विरघळतात स्वप्नांचे घायाळ घननीळ
झोपी जातात सावल्या झाडांच्या अंगणात, लटकतात अन पारंब्यात
येताच किरणे पहाटेची कष्टतात झाडे किरमिजी दूर दूर गगनात
पाखरांचे जथ्थे मग उठतात अन झेपावतात उंच उंच आभाळात
होताच सकाळ निजतो मी मेघांच्या अभ्र्यात, जन्मजन्माच्या झुल्यात
पक्षी सुवर्णवर्खी आठवणींचे फडकवत पंख सांगावा सुभगाचा सांगतात...
- समीर गायकवाड
कवीने कसे सगळे मस्त लिहावे
कवीने कसे सगळे मस्त मस्त
लिहावे, लोकांना
आवडेल असेच खरडावे.
निर्जीव चंद्र ताऱ्यांवर, समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर
मधुर गीते लिहावीत.
दोन दिसाच्या क्षणभंगुर
प्रेमावर जगड्व्याळ शब्दांची कवने लिहावीत.
काँक्रिटच्या जंगलात राहून
कुसुंबी झाडांच्या हिरवाईची शब्दफुले वेचावीत.
गुलछबू तुंदिलतनू व्हावे, बुभुक्षित चेहरे दुर्लक्षून
गोडगुलाबी चित्र रेखावे.
कोणाच्याही बेगडी सौंदर्यावर
आसक्त होत फुकाची लेखणी झिजवावी.
सृष्टीशी तादात्म्य पावू
नये ; निष्प्राण यमक, अलंकार, वृत्तांवर प्रेम करावे.
भावहीन आशयाच्या शब्दांचे
इमले रचून त्यात इमानाचे कलेवर चिणावे.
विश्वासघातक्यांवर स्तुतीसुमने
उधळत खोट्या थोरवीचे पोवाडे लिहावेत.
गंधभ्रांतीच्या शोधातील
गुलाबाच्या पाकळ्यावर प्रतिभा खर्चत राहावे.
मनातले पंगु सत्य सांगू
नये, लाचारीच्या
परिघावरती गोल गोल फिरावे.
दैन्य -विषमता, अन्याय-उपेक्षा शोषण याकडे
सराईत डोळेझाक करावी.
चिमणी पाखरे जगवली नाहीत
तरी जाळीदार घरटयावर मजबूत लिहावे.
कोरडया नात्यांत जगून अथांग
माणूसकीच्या सुमार कविता कराव्यात.
भणंग विद्रोहाचे जहर प्राशू
नये, भ्याड
समाजाविरुद्ध गरळ ओकू नये.
टीका करणे टाळावे, प्रस्थापितांची थुंकी झेलत
बधिर रचना कराव्यात.
प्रसंगी बाजारू मंगलाष्टके
लिहावीत भाटगिरी करावी कुत्र्याचे जिणे जगावे.
शब्द विकावेत, आशयाचा लिलाव करावा, खुंटलेली प्रतिभा गहाण टाकावी.
डोळ्याला झापडं लावून जगावे, जगाला कोलावे, आपल्याच कोषात जगावे.
आहेव पुरुषीपणाची कड घ्यावी, इभ्रतीचे बांडगूळ माथ्यावर
वाढवावे.
गोठलेल्या रोमरोमात अंगार
फुलवू नये, पोलादी
लेखणीचा पारा करावा.
दोनतोंडी गांडूळ व्हावे, पायातली वहाण व्हावे पण सत्यासूड
होऊ नये.
डोळ्यादेखत माणसे मरू दयावीत, मेलेल्यांवर आदर्श सूक्ते रचावीत.
कणाहीन विचार ठेवावेत, लाळघोटेपणा करत व्यवस्थेकडे
दुर्लक्ष करावे.
सत्याची बाजू घेऊ नये, बोथट आत्म्याशी बेगुमान बदफैली
करत जगावे.
कविता न ऐकताच दाद देणाऱ्या
श्रोत्यांसाठी खोटे स्मितहास्य करावे.
पुरस्कारासाठी मुजरे करावेत, उष्ट्या संमेलनासाठी झोळ्या
पसरव्यात.
सरकारकडे याचना करावी, सत्ताधिशांचे सोनेरी जोडे उराशी
कवटाळावेत.
घरासाठी अनुदाने मागावीत, खड्डयातल्या रस्त्यांना नाव
देऊन घ्यावे.
कवीने कसे सगळे मस्त मस्त
लिहावे, लोकांना
आवडेल असेच खरडावे.
या ! इथे सपरात माझ्या ...
या इथे सपरात माझ्या, जरा विसावा घ्या,
लख्ख पितळी तांब्यातले, पाणी गार प्या,
सोबतीला खडा गुळाचा ओठी विरघळवा.
पिंपळपान अंगणातले टेकवेल माथा, आस्थेने तुमच्या खांदयावरी,
गहिवरल्या गाई हंबरतील मायेने, पाठ तुम्ही धरेला तरी टेकवा.
गोऱ्हे तिचे चाटतील हात तुमचे, प्रेमाने त्याला स्पर्श तरी करून बघा !
या इथे सपरात माझ्या, सूर्य खेळे झिम्मा
कवडशात त्याच्या, आभाळ पिऊन घ्या,
संगतीला बेभान वारे काळजात भिनवा.
पारिजातक पडवीतला करेल अभिषेक फुलांचा, तुमच्या मस्तकावरी
पक्षी फांद्याफांद्यावरचे गातील प्रेमगीत, कानोसा तरी घ्या.
बुलबुल टिटव्या साळुंख्या सारेच येतील, जरा दाणे तरी टाकून बघा !
वतन की हवा
सूखी रोटीयां सिसकती है जहाँ कोने में,
न जाने कौन सोता है नंगे पाँव खुली सडक पे
आंसू सूखते है जहाँ अंधियारी गलियोंमें,
खामोशी से तडपती इन्सानियत चौराहे पे
जाती पुछती नही माटी जहाँ इन्सानसे,
झुलसते बदन को लगाती है सहमें सीने से
कतरोंकी खूनके किंमत नही होती लोगोंसे,
न जाने ये कौनसी हवा आ रही है वतनसे !
- समीर गायकवाड.
नियत
जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांना !
माती म्हणाली पावसाला,
निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांना.
पाऊस म्हणाला वाऱ्याला,
नको बोलावूस मला आता अवकाळी फिरून भेटायला
वारं म्हणालं पावसाला,
मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !
गदगदलेला फाळ म्हणाला,
चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?
गोठ्यातल्या गायी वदल्या,
माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ्यांला !
- समीर गायकवाड.
देहाचे सरपण...
जळण
गोळा करताना
मायच्या
देहाचेच झाले सरपण.
डोई
चढलेला भार मोळीचा वाहताना
तिच्या
पायाला यायचा बाभळीचा बहर.
मायची
पाऊले चालली तरच चूल चालायची
पोरांच्या
रित्या पोटापायी जंगलवाटेची हुल लागायची
माय
रातंदीस कामाला जुपून राही, जणू घाण्याचा बैल
घरादाराच्या
सावलीसाठी, काठी झाली मायच्या देहाची.
माय
उपाशी भुकेलीच निजे, चिंधूडके धडूते नेसून गावभर फिरायची
किस्नाच्या
यादीत नाव तिचेच कसे नव्हते हा सवाल आजही काळीज पोखरतो
माय
तोंडावरून हात फिरवायची तेंव्हा उरी गायचे सहस्र रावे.
रात
होताच तिच्या डोळा यायचे पाणी नि स्वप्ना यायचा जंगलातला देव अनवाणी
एके दिवशी,
प्रारब्धाने
जंगलातले झाड खुडून मायच्या डोईत रोवले
मायच्या
जिंदगानीचे झाली हजार शकले !
आता
घरात चूल नाही आणि भुकेचे ही वांदे नाहीत
आणि
हो, माय गेल्यापासून जंगल गेलंय जळूनी
बोडखी
निष्पर्ण झाडे उरलीत, त्यांच्या स्वप्नात येत असेल का माझी माय ?
- समीर गायकवाड.
गाव माझे ..
त्या
तिथे दूर वळणावरती, शांत
सुंदर गाव वसते माझे
अंधाररात्री
चांदणे जिथे, फुटक्या
छपरावरी निजते
उजळूनी
दाही दिशा जिथे, उंबरठ्यावरी
माथा रवी टेकवितो,
आकाशातला
देव जिथे, अंगणातल्या
पारिजातकात उतरतो,
उनाड
अवखळ वारा जिथे, तटतटलेल्या
कंच पिकातुनी डोलतो
देव्हाऱ्यातल्या
समईत जिथे, शीतल
प्रकाश अल्वार झिरपतो
माय
पित्यांच्या वदनी जिथे, विश्वेश्वर
तृप्ततो ते गाव माझे !
त्या
तिथे दूर वळणावरती, लालकाळ्या
मातीचे गाव वसते माझे.
गोठ्यातल्या
गाई बोलतात जिथे, माझ्या
माय बहिणींशी
अंगणातली
तुळस तादात्म्यते जिथे, कृष्णाच्या
बासरीशी
पावसाचे
पहिले जलाभिषेक जिथे, होतात
देवळाच्या कळसाशी
घुमणारे
पारवे अबोल होतात जिथे, रित्या
विहिरीच्या तळाशी
चंद्र
एकरूप होऊ पाहतो जिथे, कंदिलाच्या
पाझरणाऱ्या प्रकाशाशी
पारावरचा
वड जिथे, पारंब्यांच्या
कानाने गप्पा ऐकतो ते गाव माझे !
त्या
तिथे दूर वळणावरती, दिलदार
माणसांचे गाव वसते माझे,
श्रमलेली
पावले थांबवून जिथे, वाटसरू
देऊळी पाठ टेकतो
चावडीवरचा
न्यायनिवाडा जिथे, ओलेत्या
डोळ्यांचे थेंब पुसतो
तळ्याकाठी
खेळणाऱ्या गोप्यांच्या चेहऱ्यावर जिथे, आनंद ओसंडतो
शाळेच्या
मोडक्या फळ्यावर जिथे, सुबक
अक्षरातला देश घडतो
शेत
शिवारातून जिथे, कष्टकरी
बळीराजा निढळाचा घाम गाळतो
ताटातला
पहिला घास जिथे, मुक्या
जीवाला दिला जातो ते गाव माझे !
त्या
तिथे दूर वळणावरती, फुलपाखरांचे
पानाफुलाचे गाव वसते माझे,
माहेरी
परतलेल्या मुली जिथे, पाणंदेतच
धाय मोकलून रडतात
सासरी
नांदणाऱ्या पोरीबाळी जिथे,पाणवठ्यावरी
पदर डोळा लावतात
बांधावरच्या
शुष्क बोरीबाभळी जिथे, बारमाही
हिरव्यापिवळ्या असतात
पिक
येवो न येवो जिथे, गावकुसाच्या
कुशीत बियाणे रुजवतच असतात
नच
बरसता आषाढमेघ जिथे, अभिषेक
अश्रूंचे कोवळ्या अंकुरांना घडतात,
काळ्या
मातीचा गंध जिथे, नित्यनेमाने
भाळी लावतात ते गाव माझे !
त्या
तिथे दूर वळणावरती, जिवाभावाचे
गाव वसते माझे,
जिथे
नांदती सारी अलौकिक सुखे, ज्याला
कशाचीच उपमा नसे !
- समीर
गायकवाड.
बाभळीचा डाव ..
दूर आडरानी एक वस्तीचा ठाव, जिथं काळजात बाभळीचा डाव
उगवे सूर्य संगट पोटाचा
सवाल, हाता फुटत पारंब्या लाखलाल
काटेरी जू माणसाच्या मानेवर , जित्तेपणीचं जणू
मुकं कलेवर
खपाटी पोट बरगड्या बाहेर , डोळ्याची विहीर माथा सैरभैर
वारा खुनशी फिरे शेतशिवारातून, काळ्या मातीस
आधण आंतून
किडं करपल्या पानी चिटकून, पाल फिरे कोरडया जात्यातून
खोपटा टांगलं नशीब छिललेलं, जणू सुंद वटवाघळ
झाडा लटकलं
उन्हं तळपती संसार माथी
मारून, पेटते भूक सरपण जीवाचं जाळून
- समीर गायकवाड.
हृदयस्थ दरवळ ..
त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...