गावाकडे सांज होताच आभाळाची निळाई मातीत उतरते.
मातीतली पेंग रांगत रांगत गोठ्यात जाते,
गाईच्या डोळ्यात पाझरते.
आभाळातलं लुकलुकतं चांदणं
देव्हाऱ्यातल्या निरांजनात चकाकून उठते.
समईतल्या वातींची ज्योत शांत शीतलतेने जळू लागते.
सांजेला पडवीतला पाचोळा थिजूनी राहतो
लख्ख पुसलेल्या कंदिलाच्या काचेत चेहरा चंद्र न्याहाळतो
सांज होताच वासरे बिलगतात गाईला अन् लेकरे आपुल्या आईला!
परसातल्या घरधन्याच्या अंगावर सांज पांघरूण आभाळाचे घालते!
सांज कुरवाळते थकलेल्या झाडांना,
वेलींना, पानांना अन् सुकल्या फुलांना, सोबत करते उमलत्या कळ्यांना!
आस्ते कदम चुलीच्या पोटात शिरते अन् पेटून उठते.
चुलीवर ठेवलेल्या, मातीने सारवलेल्या पातेल्यात मायेने झिरपते,
गरीबाच्या ताटातले घास अमृताचे करून जाते.
दमल्या जीवाला झोप देते,
वासरांना माय देते, मायला आसरा देते,
आसऱ्याला देवास आणते, देवाला माती दावते,
मातीला निळ्या आभाळाची भेट घडवते.
सांज मिलन घडवते !
सांजेला विठूरायापुढे माणसाची पडती दंडवते.
सांज, स्वतःच्या अस्तित्वाला पोथीत शोधिते,
आजीच्या गोष्टीत अलगद हरवून जाते.
आजोबांच्या जीर्ण चुरगळल्या चंचीत लपून बसते,
बाजेवर हलकेच अंग टाकून पाठ मोकळी करते.
आरशात न्याहाळणाऱ्या सासूरवाशिणीच्या गजऱ्यात घुमते,
रिकाम्या ताटातून अर्धभरल्या पोटात जाते,
पोटातून डोळ्यात येते, डोळ्यातून गालावर ओघळते.
सांज हसवतेही अन् रडवतेही...
सांजेला आकाशाकडे बघताना झोप कधी लागते काही कळत नाही.
रात्र गडद झाल्यावर सांज माघारी फिरते,
परतुनी जाताना मायबापांचे हसरे सांगावे स्वप्नी सोडून जाते..

No comments:
Post a Comment