झिजलेला उंबरठा ओलांडून जाताना
अंगणातल्या तुळशीची पानं,
कृष्णाच्या बासरीवरची नाजूक पारिजातकाची चुरगळलेली फुलं,
पायाशी गुदगुल्या करणारी
ओलसर चिमुटभर काळीभोर माती
रुमालात घेऊनच घराबाहेर पडतो;
पण अख्खं जग सोबत घेतल्याचं
विलक्षण सुख मनात हिंदोळे घेत राहतं.
निघताना आई थरथरता मऊ हात डोक्यावरून फिरवते
तिच्या थकलेल्या डोळ्यात अश्रूंचा पारा चमकतो
सुकलेले ओठ काहीतरी पुटपुटतात, आशीर्वाद देतात
पाठीवरून फिरणारा तिचा हातच सारं काही सांगतो
'काळजी घे' म्हणत, तीच डोळ्याला पदर लावते
घरातून निघताना पावले जड होतात अन् डोळे खारट!
दारापर्यंत पत्नी येते, किंचित उतरल्या चेहऱ्याने
एक हाताने दाराशी चाळा करत
दुसरा हात निरोपासाठी उंचावते,
डोळ्यात प्रश्नचिन्ह तसेच ठेवून ओठ हसरे ठेवते
तिच्या डोळ्यात गाभाऱ्यातले निरंजन दिसत राहते.
लवकर परतण्याची ओढ,
ही अशी घर सोडतानाच लागून राहते.
निघताना अवखळ वारा पायात
निरोपाची रुंजी घालत राहतो
झाडांवरची पाखरे किलबिलाट करूत
त्यांचाही सांगावा कळवतात
थोडं चालून झाल्यावर
घराकडे मागे वळून बघत राहावे वाटते
प्रवास रद्द करून आईच्या कुशीत तोंड मिटून झोपी जायचे का?
गायी बैलांच्या पाठीवर हात फिरवत वाघ्यापाशी बसायचं का?
असे अवघड प्रश्न उगाच मनाची तारांबळ उडवून देतात.
आस्ते कदम काही चालून झाल्यावर नाक्यापाशी
काळीपिवळी रिक्षा दिसते,
तिची सवारी करताच सवयीने ती पुढे जाऊ लागते,
पण मन मात्र मागे जाऊ लागते.
दरवेळेस बाहेरगावी जाताना मन उचंबळून का येते,
हे मात्र उमगत नाही.
हातातल्या पिशवीला घट्ट धरून राहताच थोडे बरे वाटते
बघता बघता बसस्टॅंडपाशी पोहोचता रिक्षा थांबते
यंत्रवत बसमध्ये जाऊन बसताच ताण कमी होतो
प्रवासाचे पुढचे वेध लागतात.
वारा प्यायलेली बस पुढे जाताना तिचा कैफ और असतो
प्रवासात खिडकीपाशी बसल्यावर त्याची झिंग जाणवते
जुनेर कपड्यांनी शेतात खेळणारी काळीसावळी मुलं
त्यांच्यामागे उडणारे बगळ्यांचे शुभ्र त्रिकोणी थवे
वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार झाडं अन् त्यांच्या बहरलेल्या फांद्या
या तमाम गोष्टी मनाला आधार देत राहतात,
आप्तस्वकीयांचा विरह विसरवतात.
शेतात राबणारे शेतकरी आणि त्यांचे डौलदार बैल,
बांधावर विसावा घेत बसलेले थकलेले कष्टकरी जथ्थे,
सावल्यांच्या बिलोरी झाडावर सुरपारंब्या खेळणारी पाखरं,
पदरानं घाम टिपत लख्ख तांब्यात पाणी देणाऱ्या स्त्रिया,
हे सर्व डोळ्यात साठवतानाच कुठूनशी एक डुलकी हळूच येते.
कमीजास्त आवाज करत एसटी बस पुढे जात राहते
घराकडच्या आठवणी मध्येच फेर धरून नाचतात
पिशवीतल्या शिदोरीचा वास भुकेचे संदेश घेऊन येतो
त्यातले चार घास खाल्ले तरी मनाला तृप्तीची उभारी येते.
उन्हे कलतात, मावळतीला सावल्या जवळ येतात.
रस्त्यारस्त्यावर डोळ्यात आभाळ माळलेल्या गंधवेड्या स्त्रिया
आणि त्यांच्या पुढ्यातल्या दुरडीतल्या रंगीबिरंगी वस्तूंच्या राशी,
डोळ्यात प्रतिक्षेचे दिगंत घेऊन उभे असलेले आशाळभूत पांथस्थ
पटापट मागेपुढे होत राहतात.
नानाविध हाका नि आरोळ्यांचे आवाज;
वाटेने येत जाणारे हळदीच्या शेतांचे,
उसाच्या फडाचे, लिंबांच्या बागांचे
अन् कडुलिंबांच्या झाडाचे गंध झिम्मा खेळून जातात.
वाफाळत्या चॉकलेटी चहाची तलफ मध्येच पूर्ण होऊन जाते.
प्रवास संपतो, मुक्कामाचे नवे ठिकाण येते
तिथे पोहोचताच कामाचे वेध सुरु होतात
वेळ वेगाने जात राहतो, तारखा पुढे सरकत राहतात
फावल्या वेळात घराकडे बोलणे देखील होत राहते
रात्री पाठ टेकवल्यावर मात्र उगाच कुंद मेघ जमा होतात
झिझलेला उंबरठा, अर्धउघडे दार, आत्ममग्न पारिजातक
अन् वाटेकडे खिळलेले ओलसर डोळे तरळत राहतात.
कुठेही दूरगावी गेलो तरी
निघताना रुमालात बांधून आणलेलं घर
मनाला घरपण देत राहते,
काळजावरचे ओझे हलके होत राहते.....
- समीर गायकवाड
नोंद - दूरदर्शनवर एका असामी कवितेचा हिंदी अनुवाद ऐकून सुचलेली कविता. कामानिमित्त घराबाहेर पडलेली व्यक्ती घरासाठी किती व्याकूळ होते याचे हे शब्दचित्र.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अंगणातल्या तुळशीची पानं,
कृष्णाच्या बासरीवरची नाजूक पारिजातकाची चुरगळलेली फुलं,
पायाशी गुदगुल्या करणारी
ओलसर चिमुटभर काळीभोर माती
रुमालात घेऊनच घराबाहेर पडतो;
पण अख्खं जग सोबत घेतल्याचं
विलक्षण सुख मनात हिंदोळे घेत राहतं.
निघताना आई थरथरता मऊ हात डोक्यावरून फिरवते
तिच्या थकलेल्या डोळ्यात अश्रूंचा पारा चमकतो
सुकलेले ओठ काहीतरी पुटपुटतात, आशीर्वाद देतात
पाठीवरून फिरणारा तिचा हातच सारं काही सांगतो
'काळजी घे' म्हणत, तीच डोळ्याला पदर लावते
घरातून निघताना पावले जड होतात अन् डोळे खारट!
दारापर्यंत पत्नी येते, किंचित उतरल्या चेहऱ्याने
एक हाताने दाराशी चाळा करत
दुसरा हात निरोपासाठी उंचावते,
डोळ्यात प्रश्नचिन्ह तसेच ठेवून ओठ हसरे ठेवते
तिच्या डोळ्यात गाभाऱ्यातले निरंजन दिसत राहते.
लवकर परतण्याची ओढ,
ही अशी घर सोडतानाच लागून राहते.
निघताना अवखळ वारा पायात
निरोपाची रुंजी घालत राहतो
झाडांवरची पाखरे किलबिलाट करूत
त्यांचाही सांगावा कळवतात
थोडं चालून झाल्यावर
घराकडे मागे वळून बघत राहावे वाटते
प्रवास रद्द करून आईच्या कुशीत तोंड मिटून झोपी जायचे का?
गायी बैलांच्या पाठीवर हात फिरवत वाघ्यापाशी बसायचं का?
असे अवघड प्रश्न उगाच मनाची तारांबळ उडवून देतात.
आस्ते कदम काही चालून झाल्यावर नाक्यापाशी
काळीपिवळी रिक्षा दिसते,
तिची सवारी करताच सवयीने ती पुढे जाऊ लागते,
पण मन मात्र मागे जाऊ लागते.
दरवेळेस बाहेरगावी जाताना मन उचंबळून का येते,
हे मात्र उमगत नाही.
हातातल्या पिशवीला घट्ट धरून राहताच थोडे बरे वाटते
बघता बघता बसस्टॅंडपाशी पोहोचता रिक्षा थांबते
यंत्रवत बसमध्ये जाऊन बसताच ताण कमी होतो
प्रवासाचे पुढचे वेध लागतात.
वारा प्यायलेली बस पुढे जाताना तिचा कैफ और असतो
प्रवासात खिडकीपाशी बसल्यावर त्याची झिंग जाणवते
जुनेर कपड्यांनी शेतात खेळणारी काळीसावळी मुलं
त्यांच्यामागे उडणारे बगळ्यांचे शुभ्र त्रिकोणी थवे
वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार झाडं अन् त्यांच्या बहरलेल्या फांद्या
या तमाम गोष्टी मनाला आधार देत राहतात,
आप्तस्वकीयांचा विरह विसरवतात.
शेतात राबणारे शेतकरी आणि त्यांचे डौलदार बैल,
बांधावर विसावा घेत बसलेले थकलेले कष्टकरी जथ्थे,
सावल्यांच्या बिलोरी झाडावर सुरपारंब्या खेळणारी पाखरं,
पदरानं घाम टिपत लख्ख तांब्यात पाणी देणाऱ्या स्त्रिया,
हे सर्व डोळ्यात साठवतानाच कुठूनशी एक डुलकी हळूच येते.
कमीजास्त आवाज करत एसटी बस पुढे जात राहते
घराकडच्या आठवणी मध्येच फेर धरून नाचतात
पिशवीतल्या शिदोरीचा वास भुकेचे संदेश घेऊन येतो
त्यातले चार घास खाल्ले तरी मनाला तृप्तीची उभारी येते.
उन्हे कलतात, मावळतीला सावल्या जवळ येतात.
रस्त्यारस्त्यावर डोळ्यात आभाळ माळलेल्या गंधवेड्या स्त्रिया
आणि त्यांच्या पुढ्यातल्या दुरडीतल्या रंगीबिरंगी वस्तूंच्या राशी,
डोळ्यात प्रतिक्षेचे दिगंत घेऊन उभे असलेले आशाळभूत पांथस्थ
पटापट मागेपुढे होत राहतात.
नानाविध हाका नि आरोळ्यांचे आवाज;
वाटेने येत जाणारे हळदीच्या शेतांचे,
उसाच्या फडाचे, लिंबांच्या बागांचे
अन् कडुलिंबांच्या झाडाचे गंध झिम्मा खेळून जातात.
वाफाळत्या चॉकलेटी चहाची तलफ मध्येच पूर्ण होऊन जाते.
प्रवास संपतो, मुक्कामाचे नवे ठिकाण येते
तिथे पोहोचताच कामाचे वेध सुरु होतात
वेळ वेगाने जात राहतो, तारखा पुढे सरकत राहतात
फावल्या वेळात घराकडे बोलणे देखील होत राहते
रात्री पाठ टेकवल्यावर मात्र उगाच कुंद मेघ जमा होतात
झिझलेला उंबरठा, अर्धउघडे दार, आत्ममग्न पारिजातक
अन् वाटेकडे खिळलेले ओलसर डोळे तरळत राहतात.
कुठेही दूरगावी गेलो तरी
निघताना रुमालात बांधून आणलेलं घर
मनाला घरपण देत राहते,
काळजावरचे ओझे हलके होत राहते.....
- समीर गायकवाड
नोंद - दूरदर्शनवर एका असामी कवितेचा हिंदी अनुवाद ऐकून सुचलेली कविता. कामानिमित्त घराबाहेर पडलेली व्यक्ती घरासाठी किती व्याकूळ होते याचे हे शब्दचित्र.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:
Post a Comment