Wednesday 8 May 2019

वसुंधरेचे गोडवे ..


माण्साने आयुष्यात एकही झाड लावू नये,

मात्र जागतिक वसुंधरादिनाच्या फेस्बुकी शुभेच्छा द्याव्यात.

जोशात येऊन एखाद दुसरे झाड कुठे लावले असले तरी त्याची निगा राखू नये,

त्याला खतपाणी घालू नयेत्याला उन्हात होरपळू द्यावे,

त्याची काडीकामठी होऊ द्यावी

त्याला सुकू द्यावंजळू द्यावं

त्याला मातीतून उफाणून मुळासकट वर उपसून येऊ द्यावं.

येता जाता त्या जळून चाललेल्या शुष्क झाडाकडे

कोरडया नजरेने निर्विकारपणे फक्त बघावं,

थोडेफार वाईट वाटले तर पानाची पिंक त्यावर टाकावी

वा गुटख्याचा तोबरा त्यावर थुंकावा.

 

यातूनही नेटानं अंग धरलेलं एखाद दुसरं रोपटं

रस्त्यावर कुत्री चिरडल्याच्या सहजतेने गाडीखाली चिरडून टाकावं.

इतकं करून झाल्यावर माण्साने आपल्या प्रोफाईलला झाडांचे,

पानाफुलांचे डीपी सजवावेतहिरवाईचे कव्हर चढवून घ्यावेत.

खोटेनाटे वृक्षारोपण अभियान राबवावे,

कागदोपत्री झाडं लावून करोडो झाडे लावल्याची शहाजोग बतावणी करावी.

माण्साने दिसतील तिथली उरली सुरली झाडं तोडावीत अन

सुकत चाललेल्या चिरलेल्या ओठांनी म्हणत राहावे की,

"गेल्या हंगामापेक्षा यंदा ऊन जरा जास्तच आहे !"

 

माण्साने वसुंधरा दिनाचा इव्हेंट सेन्ट्रल एसी असलेल्या

बंदिस्त हॉलमध्ये दिमाखात साजरा करावा.

आयुष्यभर मनसोक्त प्रदूषण करावे,

नाकातोंडातून आणि जमल्यास गुदद्वारातूनही धूर सोडण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे.

मानवी घाणीची गटारे नद्यात सोडावीत

नाल्या- ओढ्यात घातक रसायने मिसळू द्यावीत.

नद्या अडवून सर्वत्र अजस्त्र धरणं बांधावीत,

मस्तकावर विशाल धुराडं वागवणारे

कराल जबड्याचे महाकाय कोंदट कारखाने उभे करावेत.

 

माण्साने जमिनीचा कस कसा कमी होईल याकडे लक्ष पुरवावे,

त्यासाठी नेटाने रासायनिक खतांचे नियमित ओव्हरडोसेस देत राहावे,

आधीच दम नसलेल्या पिकांवर बेसुमार किटकनाशके फवारावीत.

इतके करताना वेळ काढून  

जागतिक वसुंधरादिवसाचे मोठाले फ्लेक्स गल्लोगल्ली लावावेत.

त्यानंतर माण्साने वनराई बेचिराख करावी

तिथले पाणीसाठे गिळंकृत करावेत.

अन्नाच्या शोधात शहरात येणाऱ्या तहानलेल्या

वन्य पशूंना गोळ्या घालून ठार मारावे

अन वर म्हणावे की, "आजकाल जंगली श्वापदे बेधडक शहरात येताहेत !"....

 

माण्साने टेकड्या उद्ध्वस्त कराव्यातडोंगर पोखरावेत

आणि काँक्रीटच्या टोलेजंग इमारतींची जंगलं उभी करावीत,

त्यातल्या वनबीएचकेच्या खुराडयात बसून

तोंडाला मास्क बांधून 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा'चे गाणे गावे !

मी तर म्हणेन, 'पुरे झाले हे सर्व चोचले' !

फार तर शोकेसमध्ये एखाददुसरे झाड लावून त्याला हुंगावे.

   

माण्साने खरे तर आता सकळ जैवविविधता नष्ट करावी,

पृथ्वीवरील समूळ प्रजाती नष्ट कराव्यात.

अविघटनकारी कचऱ्याच्या मानवनिर्मित एव्हरेस्टवर उभं राहून

त्याचा एकट्याचाच पृथ्वीवर अधिकार आहे हे ब्रम्हांडाला ठणकावून सांगावे.

न जाणो त्यातून कैक वादही संपुष्टात येतील,

अधिक वेळ न दवडता आपण निसर्गापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे

माण्साने आता त्वरेने दाखवूनच द्यावे,

त्यासाठी हिमशिखरे वितळवावीतसमुद्र नासवावेत,

वातावरणाचे थर उसवून टाकावेत,

सगळीकडे डिजिटल विनाश घडवून आणावेत.

निष्पाप, सालस अन सर्वशक्तिमान माण्साने

भुक्कड वसुंधरादिनाचे गोडवे अजून किती साल गावेत ?

 

एक दिवस माण्साने हे करावेच,

त्याशिवाय त्याला चराचराचं मूल्य उमगणार तरी कसं ?    

 

समीर गायकवाड.

 

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...