
जड झालेले निळेपांढरे आभाळ साळसूद मांजरीगत डोळे मिटून बसतं
उनाड वारा झिरझिऱ्या कपड्यातून शिरत रापल्या कायेला खिजवत फिरतो,
उतरलेल्या खांदयाची, म्लान चेहऱ्याची जरठ झाडे
हाताची घडी घालून स्तब्ध उभी असतात
जुनेर झालेल्या सावल्या दबकतच माथ्यावर येजा करत राहतात
एखादं वाट चुकलेलं पाखरू हळूच अंगाशी लगट करून जातं,
अज्ञाताच्या शोधात भिरभिरत चाललेलं एखादं पिवळट पान अंगावर पडतं,
मग लक्ष लक्ष मोरपीसं देही फिरतात!
झाडा झुडपात निजलेले रात्रकिडे
अकारण जागे होऊन डोळे चोळत बघत राहतात
रोखल्या सराईत संशयी नजरा काळजाची कालवाकालव करतात
कावरा बावरा रस्ताही पायाखाली येताच चिमटे काढू पाहतो,
कधी काटे अंथरतो, कधी पावले भाजून काढतो.
ठिकऱ्या उडालेले मैलांचे दगड वाकुल्या दाखवत राहतात
रस्ता संपतो पण चालणं उरकत नाही,
पाय म्हणजे जणू बिनकाटयाचे होकायंत्र झालेले असते.
थिजलेल्या डोळ्यात आसमंत विरत जातो अन्
सादळलेल्या रक्ताचे संथ अभिसरण होत राहते!
गारगोट्याच्या ठिणग्या उडाव्यात तसे
क्षणभंगुर विचार मेंदूत नुसतेच तरळून जातात, निष्फळ!
भाळावरच्या विरक्त रेषांत चिरनिद्रा घेत सटवाई पडून असते
कोंदटलेल्या देहातून फक्त घामाचीच लगबग सुरु असते,
बाकीची आत गेलेली भुकेजलेली आर्त आतडी कातडी
पोट दुमडून पडलेल्या कुत्र्यागत निपचित गुडुपतात.
फरफटत मागे आलेला उस्मरलेला अंधारच शेवटी कामाला येतो,
कुठे तरी आडरानी गावकुसाबाहेरच्या जागेत कुशीत घेतो
अन् ढसाढसा रडून त्याचेच दुःख सांगतो!
उसवलेल्या बिऱ्हाडाची पालं पडतात,
दमलेली पावलं झोपी जातात, पोट जागं होतं अन्
डोळ्यातला बारमाही श्रावणसखा हलकेच पाझरू लागतो...
No comments:
Post a Comment