Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

Wednesday, 8 May 2019

कवीने कसे सगळे मस्त लिहावे

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावेलोकांना आवडेल असेच खरडावे.

निर्जीव चंद्र ताऱ्यांवरसमुद्राच्या खाऱ्या पाण्यावर मधुर गीते लिहावीत.

दोन दिसाच्या क्षणभंगुर प्रेमावर जगड्व्याळ शब्दांची कवने लिहावीत.

काँक्रिटच्या जंगलात राहून कुसुंबी झाडांच्या हिरवाईची शब्दफुले वेचावीत.

गुलछबू तुंदिलतनू व्हावेबुभुक्षित चेहरे दुर्लक्षून गोडगुलाबी चित्र रेखावे.

कोणाच्याही बेगडी सौंदर्यावर आसक्त होत फुकाची लेखणी झिजवावी.

सृष्टीशी तादात्म्य पावू नये ; निष्प्राण यमकअलंकारवृत्तांवर प्रेम करावे.

भावहीन आशयाच्या शब्दांचे इमले रचून त्यात इमानाचे कलेवर चिणावे. 

विश्वासघातक्यांवर स्तुतीसुमने उधळत खोट्या थोरवीचे पोवाडे लिहावेत.

गंधभ्रांतीच्या शोधातील गुलाबाच्या पाकळ्यावर प्रतिभा खर्चत राहावे.

मनातले पंगु सत्य सांगू नयेलाचारीच्या परिघावरती गोल गोल फिरावे.

दैन्य -विषमताअन्याय-उपेक्षा शोषण याकडे सराईत डोळेझाक करावी.

चिमणी पाखरे जगवली नाहीत तरी जाळीदार घरटयावर मजबूत लिहावे.

कोरडया नात्यांत जगून अथांग माणूसकीच्या सुमार कविता कराव्यात.

भणंग विद्रोहाचे जहर प्राशू नयेभ्याड समाजाविरुद्ध गरळ ओकू नये.

टीका करणे टाळावेप्रस्थापितांची थुंकी झेलत बधिर रचना कराव्यात.

प्रसंगी बाजारू मंगलाष्टके लिहावीत भाटगिरी करावी कुत्र्याचे जिणे जगावे.

शब्द विकावेतआशयाचा लिलाव करावाखुंटलेली प्रतिभा गहाण टाकावी.

डोळ्याला झापडं लावून जगावेजगाला कोलावेआपल्याच कोषात जगावे.

आहेव पुरुषीपणाची कड घ्यावीइभ्रतीचे बांडगूळ माथ्यावर वाढवावे.

गोठलेल्या रोमरोमात अंगार फुलवू नयेपोलादी लेखणीचा पारा करावा. 

दोनतोंडी गांडूळ व्हावेपायातली वहाण व्हावे पण सत्यासूड होऊ नये.

डोळ्यादेखत माणसे मरू दयावीतमेलेल्यांवर आदर्श सूक्ते रचावीत.

कणाहीन विचार ठेवावेतलाळघोटेपणा करत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करावे.

सत्याची बाजू घेऊ नयेबोथट आत्म्याशी बेगुमान बदफैली करत जगावे.

कविता न ऐकताच दाद देणाऱ्या श्रोत्यांसाठी खोटे स्मितहास्य करावे.

पुरस्कारासाठी मुजरे करावेतउष्ट्या संमेलनासाठी झोळ्या पसरव्यात.

सरकारकडे याचना करावीसत्ताधिशांचे सोनेरी जोडे उराशी कवटाळावेत.  

घरासाठी अनुदाने मागावीतखड्डयातल्या रस्त्यांना नाव देऊन घ्यावे.

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावेलोकांना आवडेल असेच खरडावे.

 

Wednesday, 24 April 2019

वसुंधरेच्या कविता...



वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष !
आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो
आणि त्याला साहित्य म्हणतो !
वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य !
आमची गीतेही खोटीच असतात.
खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात.

जसे की,
आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठांवर खेळतं !
पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते,
तिची भाषा असते मृदगंधाची !

मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्यासाठी तिष्टत असतो
अन चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर झेपावते,
वटवृक्षाचा कोळसा होतो पण मरतानाही तो गीत गातो.
त्याची भाषा असते मिठीची !

वसुंधरा जेंव्हा रुसते तेंव्हा
तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढगही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात.
वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात,
वृक्षांपाशी आपला निरोप देतात अन एके दिवशी संततधार बरसून तिला चिंब भिजवतात.
ते गीत असते मिलनाचे !

अप्सरेच्या तलम केसांत माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखली फुले मुकीच राहती
झाडांवरून गळून पडणारी कोमेजली फुले आनंदे गिरक्या घेत गीत गाती,
त्यात असते तत्व जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे !

असलं काही आपण रचू शकू,
तेंव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल,
गीत म्हणता येईल,
साहित्य म्हणता येईल.
तोवर आपला केवळ पोकळ शब्दखेळच चालू आहे असं म्हणायचे......

- समीर गायकवाड.

खलिल जिब्रानच्या कवितेवरून सुचलेलं..

Tuesday, 22 January 2019

नभाच्या गर्भात

कोलाहल दूरवर उठवळ उन्हांचा
गायीच्या डोळ्यातले बेट साकळे मनात
पान्हा आटता नदीच्या स्वप्नांचा
रत्नजडीत पिसारे मोरांचे कुढती वनात
तूझे सुतोवाच करतो रव उल्कांचा
झुरतो पाऊस उष्म नभाच्या गर्भात...

अन्वयार्थ –

या कवितेत 'उठवळ उन्हे' हे प्रतिक आहे जगातील अघोरी लोकांचे जे इतरांच्या भावविश्वात डोकावून त्याचे जगणे हराम करून जातात. अशा वेळी दुःखांचे कढ नकळत मनात साठत जातात. नवा उन्मेष, सृजनता सगळं काही बेचिराख होऊन जातं जणू काही नदीचा पान्हा आटावा अन तिचे पात्र कायमचे कोरडे पडावे तसे मन शुष्क होऊन जाते ! प्रतिभेचे पंख झडून पडतात आणि मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेऊ लागते, जे कधीच हाती लागत नाही त्यासाठी कुढत राहते. अशा वेळी जन्ममृत्यूचे प्रतिक असणारी उल्का जगण्याचा नवा संदेश घेऊन येते. उष्म मेघांच्या गर्भात रोज नव्याने निजताना प्रतिभाशक्तीला नित्य नवे धुमारे फुटू लागतात पण व्यक्त होता येत नाही की मनसोक्त कोसळता येत नाही म्हणून केवळ झुरणे उरते! अशा अर्थाची ही कविता.

- समीर गायकवाड

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...