Wednesday, 24 April 2019

जायबंदी हरणाची कविता



तलम त्वचेवर व्रण पडावेत तशी माळरानात पालं पडतात ..
आभाळाला भळभळून खोक पडल्यागत
मातीच्या छातीवर चुलवणं उभी ठाकतात.
खुरपल्या हातांनी घट्ट मरणमेखा ठोकल्यावरही
कधी पालं टिकतात आदिम चिवट मुळांगत, तर कधी
वर्णभेदी वादळाच्या विकट तडाख्यात उन्मळून पडतात!
रणरणत्या दिर्घउन्हांत
जायबंदी हरणासारखी पालं दिवसभर बसून कण्हत असतात.

सांजेस उदास आभाळात अंधारगर्भ वाढला की
पालातल्या खोल गेलेल्या पोटांना
धगधगत्या चुलीची स्वप्ने पडतात.
ओल्यासुक्या सरपणाबरोबर
पालातली माणसंही जळत राहतात,
सरपण चुलीत जळत राहतं आणि माणसं चुलीबाहेर!

पोरावांना फाटक्या छातीशी धरून
त्यांचे ओठ ओले करणाऱ्या
पालातल्या हडकुळया आईबाईचे ओठ भेगाळून जातात.
दिवसभर फिरूनही
धन्याच्या हाती काही लागलं नाही तर
जळणातलं एखादं लाकूड तिच्याच पाठीवर बसतं.
तिचा अश्राप जीव कळवळून उठतो,
छातीला बिलगलेलं पोर खाली पडतं.
पालात कुणी कंबरेत वाकलेली जीर्ण काठी असली तर
ती मध्ये पडते.

दरम्यान हरलेल्या रात्रीस भेगाळलेले ओठ
पुन्हा कुस्करले जातात
तेव्हढेच मर्दुमकीचे दांभिक समाधान!
किरकिरणाऱ्या रात्रकिडयाच्या आवाजात तिचं कन्हणं विरतं
फिकट झालेल्या कंदिलाच्या उष्णतेने
तिचे भाकड अश्रू सुकतात.

बोडखी रात्र धुंद होताच
गाव साखरझोपेच्या रेशीम रजईत गुरफटून जातं तेव्हा
माळावरची पालं आपल्या प्रारब्धाचा गळा घोटून
भटक्या कुत्र्यांच्या स्वरात स्वर मिसळून रडत असतात!

दिवसामागून दिवस जातात, पालं थकून जातात
दगडधोंड्याच्या मातीत खेळून पोरवांचे गुडघे फुटून निघतात
चुलीतली लाकडं पेटीनाशी झाली की
खोल गेलेल्या डोळ्याचे पालकरी आपला मुक्काम हलवतात.
जखमेवरच्या खपल्या निघाव्या तशी पालं निघतात,
मुळासकट उठतात!

पालं उठताना फुरंगटलेली उदास पाखरं चोच वेळावून बसतात,
झाडं आपल्या अचलतेचा मूक टाहो फोडतात.
पालातले खंगलेले जीव नशिबाचा तमाशा घेऊन
रित्या हाती सैरभैर फिरण्यास सज्ज होतात.

पालं जिथून जिथून जातात
तिथल्या शुष्क मातीत उमटतात
त्यांच्या दग्ध स्वप्नांच्या भग्न पाऊलखुणा.
ज्यात मिसळलेले असतात चिमुरडयाच्या ओठावरून ओघळलेले
आईच्या न गवसलेल्या दुधाचे दोन थेंब.

तीच माती विश्वनिहंत्याच्या तोंडात घालून
तिची चव त्याला विचारणार आहे....

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...