Tuesday, 24 September 2024

चार कावळे (चार कौए)


खूप नव्हते, होते फक्त चार कावळे काळे
त्यांनी हे निश्चित केलं की उडणारे पक्षी सारे

त्यांच्याच ढंगाने उडतील, थांबतील, खातील आणि गातील
ते ज्याला उत्सव घोषित करतील तोच सारे साजरा करतील
 
कधी कधी जादू होऊन जाते विश्वामध्ये
दुनियाभरचे गुण दिसतात अवगुण्यामध्ये!

हे चार अवगुणी, मोठे मुकुट शिरोमणि झाले
गिधाड, गरुड आणि बाज यांचे सेवक झाले

हंस, मोर, चातक, चिमण्या सारे खिजगणतीत
हात बांधून सारे उभे राहिले विनम्र मुद्रेत

हुकूम झाला, चातक पक्षी गुंजारव करणार नाहीत
'पिहू पिहू' सोडून त्याऐवजी काव काव गातील

वीसेक तऱ्हेची कामं दिली गेली चिमण्यांना
खाणंपिणं, मौज मस्ती बिनकामाच्यांना

कावळ्यांचं असं फावलं की पाचही बोटे तुपाशी
मोठे मोठे मनसुबे प्रसवले त्यांच्या मनाशी

उडण्याचेही नियम असे काही बदलले
की उडणारे फक्त जागीच बसून राहिले

पुढे काय घडलं, सांगणं फार कठीण आहे
हा काळ कवीचा नसून चार कावळ्यांचा आहे

उत्सुकता वाटलीच तर यावे माझ्या घरी
गोष्ट ही मोठी, थोडक्यात कशी ऐकवावी

प्रसिद्ध कवी भवानीप्रसाद मिश्र यांच्या विख्यात 'चार कौए' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद. आज हिंदी दिवस. हिंदीवर प्रेम करणाऱ्या सर्व बहुभाषिकांना हिंदी दिनाच्या सदिच्छा!

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...