Tuesday, 9 November 2021

दवात उमलत्या वेदना....



पावसाने गोठयातल्या चिखलात रुतलेलं
मथीचं आजारी अशक्त वासरू मेलं.

त्यालाही तिथंच पुरलंय जिथं
कधी काळी चित्रीला पुरलं होतं
आता चार दिवस उलटून गेलेत,
दरम्यान एकही रानफुल उमललं नाही.

मथीचं दूध आटलंय
दावणीला उभी असते ती
निर्विकारपणे
मात्र तिचे डोळे अखंड वाहतात
मथीचं ते शेवटचंच वेत होतं.

दुपारच्यानं आई गोठ्यात गेली की ती मथीपाशी बसते
मग आई आणि मथी दोघीही आसवत जातात
त्यांची काही दुःखे समान असावीत!

त्यांना रडताना पाहून
कडब्याच्या गंजीवर एकटीच बसलेली साळुंखी भावूक होते

घोटाभर चिखलात आडवी पडलेली
जुंधळयाची हिरवी सोनेरी ताटं
त्या दोघींच्या दुःखात सामील होतात.

सांजंला आई वृंदावनापाशी दिवा लावते तेंव्हा
दिव्याच्या केशरी पिवळ्या ज्योतीत
उद्याच्या आशा चौदिशेला तेवत राहतात

रातीला दावं मोकळं सोडलेली मथी
नकळत आईपाशी बाजेजवळ येऊन बसते
खरबरीत जिभेने तिचे हातपाय चाटत राहते.

मध्यानरातीला चान्न्या आईपाशी येतात
तिच्या भेगाळलेल्या पायापाशी झोपी जातात

त्या वक्ताला मथी, तिचे अशक्त वासरू आणि चित्री
सगळेक तिथे टक्क हजर असतात

मग ओलेती रात्र त्यांच्या डोळ्यांतून पाझरत राहते
पाय पोटात दुमडून
एकमेकींच्या पोटावर डोकं टेकून त्या अल्लाद निजतात
तेंव्हा कुठं झाडं, पानं. फुलं, पिकं, डोबी, गोठा, शेतशिवार डोळं मिटतं.

त्यांच्या समग्र वेदना सकाळच्या दवातून उमललेल्या असतात! 

- समीर गायकवाड

Monday, 22 March 2021

हे रस्ते संपू नयेत..

काही वेळात सूर्यास्त होईल
घराकडे निघणारी पावले आता पहिल्यासारखी असोशीने पडत नाहीत
ती रेंगाळतात रस्त्यावरच्या रोषणाईत, स्ट्रीटलाईटच्या गर्द फिकट उजेडात
सकाळी दुपारी सावल्या देणारी झाडं फांद्या वाकवून उभी असतात सांजेस
ती वाट पाहतात उरल्या सुरल्या पक्षांची
जी अजूनही शहरातल्या झाडांवर जीव लावून आहेत
त्यांचा परतीचा किलबिलाट ऐकून झाडे रस्ते तृप्त होत असतील
कदाचित संधीकाळास देखील त्याची लत लागली असावी
पण आमचं काय ?
घरातून निघणं आणि घरी परतणं
ही क्रिया इतकी निर्जीव कशी झाली याचे उत्तर शोधतोय
बऱ्याचदा सांजेस शहरातल्या रस्त्यांवरचा कोलाहल खूप आधार देऊन जातो
एकटं असल्याची जाणीव करकचून मोडून काढतो
कधी कधी वाटतं
ही संध्याकाळ, हा गोंगाट संपू नये, हे रस्ते संपू नयेत
नेमकी ही कशाची ओढ आहे कोडं काही सुटत नाही..

- समीर गायकवाड 

Saturday, 6 March 2021

रंग उदास झाला...

जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला...
हंबरला पिंपळ सांज आभाळी साकळताना
 
शांत जलौघात उतरले प्रतिबिंब अखेरच्या पक्षांचे
घुटमळला प्रवाह नदीचा शोधता तिच्या ठशांना.
 
मेंदीचा हातावरल्या तिचा गंध उरला भवताली
जडशीळ झाली नदी वाहून तिला नेताना

गेले स्वप्न विरघळून पापण्यात चिणलेले
गहिवरल्या चांदण्या डोळ्यात निष्प्राण डोकावताना
 
जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला
मुका झाला रावा चंद्रकोरी आड जाताना....
~~~ ~~~~ ~~~ ~~~~ ~~~~~
या कवितेची पार्श्वभूमी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. बनारस म्हणजेच वाराणसीच्या
मणिकर्णिकेच्या घाटावर मृतदेहांवर संस्कार करण्याचं काम अविरत सुरु असतं. दहन देण्याआधी जातधर्म कुळ गोत्र सांगावं लागतं. मग मुर्दहिया त्या प्रेताचे अग्नीसंस्कार पार पाडतो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बनारसमधील शिवदासपूर या वेश्यावस्तीत मरण पावलेल्या बायकांना इथं दहन दिले जात नसे. इतरत्रच त्यांचे विधी पार पाडावे लागत असत. १९९२ मध्ये अकाली मरण पावलेल्या जसोदाबाई या तरुण वेश्येचा मृतदेह अन्य वेश्यांनी लपूनछपून घाटापाशी आणला. मात्र स्त्रियांना पुढे येण्याची अनुमती नसल्याने त्यांनी वेगळी शक्कल लढवली. घाटाच्या पुढच्या भागात त्या गोळा झाल्या आणि जसोदेच्या इच्छेनुसार अग्नी न देता तिला गंगेच्या हवाली केलं. असेही तिथे अर्धेमुर्धे जळालेले मृतदेहही बऱ्याचदा गंगेत सोडले जातात. त्या अर्धवट जळालेल्या कलेवरांच्या साथीने जसोदेचा देह वाहत गेला. काही दिवसांनी बिंग फुटलं. पोलिसांना बायकांना दम देऊन सोडलं. आता परिस्थिती बदलली आहे मात्र रिवाज तेच आहेत. ही कविता जसोदेसाठी लिहिलीय....

मरणाऱ्याच्या पाठीमागे...

कुणी एक मरण पावल्याची बातमी कळताच 
अर्ध्याहून अधिकांना यात स्वारस्य असतं की 
काय झालं ? कशामुळे मरण आलं ?

वास्तवात हे कशासाठी जाणून घ्यायचं असतं ?
मरण कसं आलं हे उमगताच मृताबद्दलचे पूर्वानुग्रह कच्चेपक्के करायचे असतात
व्यक्ती मरण पावल्यावर श्रद्धांजल्या वाहताना ते कामी येतात !

एक सांगू का ? 
माणूस मेला बात खतम. 
मागच्या श्रद्धांजल्या सब झूठ

एक शिरस्ता म्हणून जगाप्रमाणेच मी ही वाहतो श्रद्धांजली
पुढच्याच क्षणाला दुसऱ्या एकाला देतो शुभेच्छा
सारंच कोरडं... 

तरी एक बरे झाले 
की इमोज्या आल्या. चार शब्द टायपायचे कष्ट वाचले
तसेही श्रद्धांजली, शुभेच्छाही कॉपीपेस्टेड असतात तरी कुणाला कळते काय ?

अपवादाची बेसरबिंदी सोडता  
तिथं सारा समांतर शुष्क भावबाजार
स्वस्त झाल्या भावना नि फुटकळ झाले प्रकटन विचार ... 

लोक वदतात बद्धकोष्ठी भाव आणून, 
कुणी म्हणतो मोठी पोकळी निर्माण झाली. अपरिमित हानी झाली 
अमुक एक पोरकं झालं. वाणी खुंटली. स्तब्ध थिजून अबोल झालो...

खरं तर सर्वांनाच ठाऊक असतं की 
घंटा फरक कुणालाच पडलेला नसतो
ज्याचं रक्ताचं गेलेलं असतं त्याचा तरी शोक किती खरा असतो ?
 
किती एक बोल फुकाचे 
खरे तर हे नाममात्र दाखले सुखदुःखात सामील असल्याचे
भीती असते भावनेच्या प्रवाहात नसलो तर संवेदनहीन ठरण्याची  

वास्तवात इथल्या रोजच्या मरणांचे दुःख तरी किती कुणी आणि का करावे ?
बरे झाले दोस्त हो 
मरणाऱ्याला कळत नसते, जग पाठीमागे त्याच्याबद्दल काय बोलत असते !

- समीर गायकवाड

Monday, 22 February 2021

भूक

स्वप्नात काहीबाही येतं.
बालपणी शाळेबाहेर कुष्ठरोगी भीक मागत बसलेला असायचा.
तेलकट चेहऱ्याचा, कानाच्या पाळ्या जाड झालेला
नाकाचा सांडगा झालेला, गालाची हाडे वर आलेला
डोईचे केस आणि डोळ्याच्या पापण्या झडलेला, भुवया विरळ झालेला
कालच्या स्वप्नात हाती तेच काळपटलेलं जर्मनचं वाडगं घेऊन फिरत होता
फिरून फिरून त्याच्या पावलांत बैलाचे खुर फुटलेले
अन्नाच्या शोधात तो वणवण भटकत होता
खूप काळ फिरत होता तो
त्याचं शल्य त्याच्या डोळ्यात स्पष्ट तरळत होतं
बराच वेळ असाच निशब्द गेला.
काही क्षणासाठी डोळ्यापुढे अंधार झाला आणि
तो पुन्हा दिसला..

Sunday, 14 February 2021

रविवारची दुपार

आणखी एक रविवारची दुपार आलीय
सवयीने तू नाक्याखालच्या ब्रिजपाशी उभी असशील
सुसाट वाहने येत जात असतील सराईतपणे  
झाडं असतील धुराने धुळीने पेंगुळलेली
कडेला पोलीस उभा असेल थोडासा विमनस्क थोडासा बेगुमान

आज शोभा-डेंनी टाईम्समध्ये लिहिलंय की, राहिला नाही
गोवा पहिल्यासारखा
समुद्रतट तसेच आहेत मात्र रेस्तरॉ, गल्ल्या, माणसं, खानपान सगळं बदललंय म्हणे
राहिलंय काय आता पहिल्यासारखं
कुठल्याशा पोर्टलवर आज लाईव्ह लिलाव आहे मुलीचा
पूर्वीही घडत नव्हतं का असंच काहीसं ?

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना
 
समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

वेडे कबीर..

अस्ताव्यस्त बेफाम वाढलेलं बकाल शहर दिवसेंदिवस प्रेमासाठी आक्रसत चाललंय
युगुले इथे शोधतात जागा, आडोसा, एकांत.
पण कुठे मिळत नाही.
भवताली मात्र असते गर्दी, गर्दी, गर्दी आणि प्रेमाचे गारदी.
युगुले बसतात दिशाहीन प्रवासाच्या रिक्षात
बागेच्या कोपऱ्यात, पडक्या इमारतीच्या भग्न अवशेषात
बंद पडलेल्या कारखान्याच्या दर्पयुक्त परिसरात
अर्धवट बांधकाम झालेल्या सुनसान इमारतीत
अपार्टमेंटच्या चाळीच्या वरच्या मजल्याच्या जिन्यात
शहराबाहेर जाणाऱ्या भकास वाढलेल्या वस्त्यालगतच्या ओसाड भागात
झाडांच्या सांदीत
बकवास चित्रपटाच्या अंधाऱ्या थियेटरात
वर्किंग अवर्स संपलेल्या ऑफिसात
सुटीच्या दिवशी कचेऱ्यांच्या कुंपणात
निर्मनुष्य गल्ल्यात, पडक्या घरात
चादरबदली लॉजच्या गलिच्छ मळक्या खोल्यांत
जिथे कुठे असेल एकांत
तिथे असतात युगुले
मनात हजारो विचारांचे काहूर घेऊन !

Friday, 12 February 2021

चंद्राचं कन्हणं...

रात्र कलताना सज्जात उभी असतेस दुपट्टा ओढून डोक्यावरती
केसात नटमोगरा माळूनी,
भडक लेपांचे आवरण चेहऱ्यावर लेपूनी.
तुझ्या देहाभवती पिंगा घालत रात्र फुलत जाते.
वाढत्या गर्दीच्या साक्षीने.
रात्र सरते, माणसं पांगतात.
त्या रस्त्यावर पसरलेला असतो मोगऱ्याचा मंद दरवळ.
भकास रस्त्यावरून घरी परतताना सोबतीला माझ्या चंद्र असतो.
तो तुझे गहिरे किस्से ऐकवतो
त्यानं कित्येक रात्री तुझ्या दारं खिडक्यात घालवल्यात.
आताशा तुझ्या खोलीच्या कोनाड्यात रोजच्या अंधारात कन्हण्याचा जो आवाज येतो ना
तो त्याचाच आहे...
- समीर गायकवाड

Wednesday, 10 February 2021

काळजाची बाभळ ..


कालच्या पावसाची नाही जमली वेचणी
स्वप्नांची झाली छाटणी

वाहून गेला जुंधळा, कांदा कोवळा
थरारल्या साक्षीच्या कातरवेळा

विस्कटल्या तुरी
पानगळल्या बोरी.

फड सैरभैर ऊसाचा
शिग तरंगला कडब्याचा.

पाखरांची शाळा बांधावर
घरट्याचं मढं झाडावर

मोडल्या माना वृक्षांच्या
विझल्या वाती दिव्यांच्या

आता पुन्हा रिती दावण
छळती तिचे जुनेच व्रण.

गोठ्याच्या छताला
आता टांगतो भविष्याला

तरीही पावसाचे या नुठले वळ
काळजाची झाली बाभळ....

- समीर गायकवाड

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...