Sunday, 16 October 2022

दरवळ अखेरपर्यंतची

अनेक वर्षांनी तिला भेटल्यानंतरही तो तिच्याजवळ गेला नाही
दुरून पाहत राहिला
नजर चुकवून न्याहाळत!
ती ही रेंगाळली बराच वेळ उगाच.
तोही उस्मरला तिच्या डोळ्यातले भाव निरखून
तोच तर वस्तीस होता तिच्या शुष्क निस्तेज डोळ्यांच्या कोपऱ्यात!
अंधार गर्द होताच लोक एकेक करून निघाले
तीही गेली पतीसमवेत
गर्दी पुरी पांगली,
बराचसा निर्मनुष्य झाला इलाखा
मग चोरपावलांनी तो बसला तिथे जाऊन,
जिथे ती बसून होती कैक वेळ
तिथल्या दरवळाने तो अनिवार आनंदला.
तिने तेच अत्तर लावलेलं होतं जे त्याला पसंत होतं
ती हवा फुफ्फुसात भरून तो आता घराकडे निघालाय
त्याच्या एकाकी घरात तो एकट्याने कधी मेला जरी
तरी तिथे आता तोच गंध दरवळेल.. . .. .. . . .. . . . . . . .
 
- समीर गायकवाड

Thursday, 15 September 2022

डोळ्यातलं आभाळ

आठवणींच्या मेघांचा रस्ता नेहमीच हरवलेला असतो
ते येतात असेच अनाहूत 
आणि दाटून येतं आभाळ अचानक.
कालची प्रखर उन्हेच बरी होती असं मग वाटू लागतं
घरांना खिडकी नसली तरी चालते. 
मनातल्या खिडकीत 
एकसंध बसता यायला हवं.
बाहेर हात बांधून उभं असलेलं गच्च साचलेलं आभाळ 
मग आपल्या डोळ्यात रितं करता येतं..
आपलं रितेपण दूर होण्याचा याहून चांगला मार्ग नाही!

Monday, 12 September 2022

जिभा काढून घेतल्यात त्यांनी..


जिभा काढून घेतल्यात त्यांनी आणि
मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं, बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय
आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय,
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!

भादव्यातल्या उन्ही माळाच्या उष्ण काठी...

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
चिंचेच्या चिगोरी एक
निजे गाय थकलेली
पिऊनी साय सावली

डोळ्यात तिच्या झुरे
निष्पर्ण झाड शोकाचे
पक्षांना भूल स्वप्नांची
पंखांत ओल फुलांची!

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
सुकल्या खोडाच्या पोटी
भुकेले पिलू घरटयात  
घार दूर मेघांच्या अभ्ऱ्यात      

चोचीस होती भास
इवल्याशा घासांचे
ओशाळे बरड रान
गळता अखेरचे पान.

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी...


श्रावणातला पाऊस ओसरला की भाद्रपदातल्या उन्हांचे दिवस सुरु होतात. भाद्रपदातलं ऊन अंगाला चटके देतं. भरपूर पाऊस पडून गेलेला असल्याने मोकार उन्हे पडताच मातीतून धग बाहेर पडू लागते. मात्र सर्वच शेतशिवारात असं घडत नसतं. बरड मातीचा एखादा निष्पर्ण माळ असतो तिथे हे दृश्य दिसत नाही. अशा बांधांवर नुसती गरम हवा वाहत असते, रोरावणारा वारा बांधांच्या ऊष्ण काठांशी विसावतो आणि बांध अजून तापतात. अशा बांधावर एखादं चिंचेचं झाड असलं तर आसपासच्या शेतातली एखादी थकलेली भाकड गाय सावली पिऊन दिवसभर निव्वळ बसून राहते. सावली तिच्या आसपास मागेपुढे होत राहते. तिथेच शेजारी असणाऱ्या निष्पर्ण अशोकाच्या खोडातल्या घरट्यात जिवंत राहिलेलं एखादंच पिलू बसून असतं डोळे मिटल्या अवस्थेत. त्याला भास होत असतात आईने घास भरवल्याचे, त्याची चोच नकळत उघडझाप करत राहते मात्र त्याची आई दूर मेघांच्या अभ्र्यात विहरत असते. हे सगळं कमालीचं संथ आणि उदासवाणं असतं, परिणामी अशोकाचं अखेरचं पान गळून पडतं तेंव्हा ते बरड मातीचं रान विलक्षण ओशाळतं, कारण आपल्याही कुशीत हिरवे पिवळे कोंब उगवावेत झाडं मोठी व्हावीत त्यांना आभाळभर पाने फुले यावीत आणि त्यावर घरटी व्हावीत असं त्या मातीला वाटत असतं!

- समीर गायकवाड.  

Tuesday, 15 March 2022

केवळ एक वचन...

केवळ एक वचन...

जेंव्हा तू प्रेमाची वचने देत होतास
तेंव्हा तुझ्या तप्त तळहातांत माझा थरथरता हात होता
त्याच वेळी, तुझ्या घरातल्या भिंतीवरती नजर माझी खिळली
तसबिरीत तिथे चित्र होते टांगलेले.

ज्यात एक तरुण स्त्री जात्यावर दळत होती आणि
एक वृद्धा सुरकुतल्या मुठींनी टाकत होती धान्य
शेजारीच पडून होता धान्याचा अर्धा रिता हंडा
जो त्यांना त्यांच्या उर्वरित लढाईची आठवण करून देत होता

त्याच तसबिरीत होता एक तरुण पुरुष
जो भिंतीस डोकं टेकवून
ओढत होता हुक्क्याची गुडगुडी.

चित्राच्या कोपऱ्यात बसून होता एक वृद्ध
जो वाजवत होता सारंगी !

हे सजना तुझ्या प्रेमाचा मी स्वीकार करतेय
ते ही सप्तपदीच्या सात फेऱ्यांशिवाय..

मात्र एक वचन हवेय मला
जेंव्हा माझा मुलगा त्याच्या भावी प्रेमिकेस प्रेमाच्या आणाभाका देत असेल
तेंव्हा ही असावे एक चित्र याच भिंतीवर

ज्यातली वृद्धा वाजवत असावी सारंगी
म्हातारा बसुनी असावा निवांत ओढीत हुक्क्याची गुडगुडी
आणि
धान्य दळत असावी तरुण स्त्री
संगतीस तिच्या असावा तरुण पुरुष !

हे सजना सांग,
तू चित्रातील पात्रांची अशी अदलाबदल करण्याचे वचन देशील का मला ?

~~~ ~~~~ ~~~~ ~~~~ ~~~~~

नोंद - विख्यात हिंदी कवयित्री मृदुला शुक्ला यांच्या 'बस एक वचन' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे.

या कवितेत विविध भावचित्रे आपसात विरघळत जातात आणि एक सजीव दृश्य आपल्या नजरेपुढे उभं राहतं ज्यात अनेक गोष्टींची चुटपुट लागून राहते.
आज प्रेमाचा वचनदिवस आहे, कवितेत प्रेमिकेने मागितलेलं वचन कुणी आज वास्तवात मागत असेल काय ?

- समीर गायकवाड

Monday, 14 February 2022

आठवणींचे अत्तर ...

खुशाल माळतेस गजरा केसांत तू
गंधवेड्या वाऱ्याचं भान मग हरपत असतं
इथे आधीच आठवणींचे अत्तर छळतेय
जुन्या जखमांचं दुःख नव्याने उमगत राहतं

भीतीने मिटू नकोस डोळे
ओठांवर ओठ टेकवल्याने कुणी मरत नसतं....
नजरेनेही जखमा होतात
जेंव्हा कुणी बघून न बघितल्यासारखं करत असतं....

पदराआड लपवू नकोस चेहरा
फारतर बोलणं खुंटेल, अबोल नातं मरत नसतं ...
तुझं हे असं तर माझी वेगळीच तऱ्हा
चेहऱ्यावरून तुझ्या, नजर हटू नये असंच वाटत असतं...

Tuesday, 9 November 2021

दवात उमलत्या वेदना....



पावसाने गोठयातल्या चिखलात रुतलेलं
मथीचं आजारी अशक्त वासरू मेलं.

त्यालाही तिथंच पुरलंय जिथं
कधी काळी चित्रीला पुरलं होतं
आता चार दिवस उलटून गेलेत,
दरम्यान एकही रानफुल उमललं नाही.

मथीचं दूध आटलंय
दावणीला उभी असते ती
निर्विकारपणे
मात्र तिचे डोळे अखंड वाहतात
मथीचं ते शेवटचंच वेत होतं.

दुपारच्यानं आई गोठ्यात गेली की ती मथीपाशी बसते
मग आई आणि मथी दोघीही आसवत जातात
त्यांची काही दुःखे समान असावीत!

त्यांना रडताना पाहून
कडब्याच्या गंजीवर एकटीच बसलेली साळुंखी भावूक होते

घोटाभर चिखलात आडवी पडलेली
जुंधळयाची हिरवी सोनेरी ताटं
त्या दोघींच्या दुःखात सामील होतात.

सांजंला आई वृंदावनापाशी दिवा लावते तेंव्हा
दिव्याच्या केशरी पिवळ्या ज्योतीत
उद्याच्या आशा चौदिशेला तेवत राहतात

रातीला दावं मोकळं सोडलेली मथी
नकळत आईपाशी बाजेजवळ येऊन बसते
खरबरीत जिभेने तिचे हातपाय चाटत राहते.

मध्यानरातीला चान्न्या आईपाशी येतात
तिच्या भेगाळलेल्या पायापाशी झोपी जातात

त्या वक्ताला मथी, तिचे अशक्त वासरू आणि चित्री
सगळेक तिथे टक्क हजर असतात

मग ओलेती रात्र त्यांच्या डोळ्यांतून पाझरत राहते
पाय पोटात दुमडून
एकमेकींच्या पोटावर डोकं टेकून त्या अल्लाद निजतात
तेंव्हा कुठं झाडं, पानं. फुलं, पिकं, डोबी, गोठा, शेतशिवार डोळं मिटतं.

त्यांच्या समग्र वेदना सकाळच्या दवातून उमललेल्या असतात! 

- समीर गायकवाड

Monday, 22 March 2021

हे रस्ते संपू नयेत..

काही वेळात सूर्यास्त होईल
घराकडे निघणारी पावले आता पहिल्यासारखी असोशीने पडत नाहीत
ती रेंगाळतात रस्त्यावरच्या रोषणाईत, स्ट्रीटलाईटच्या गर्द फिकट उजेडात
सकाळी दुपारी सावल्या देणारी झाडं फांद्या वाकवून उभी असतात सांजेस
ती वाट पाहतात उरल्या सुरल्या पक्षांची
जी अजूनही शहरातल्या झाडांवर जीव लावून आहेत
त्यांचा परतीचा किलबिलाट ऐकून झाडे रस्ते तृप्त होत असतील
कदाचित संधीकाळास देखील त्याची लत लागली असावी
पण आमचं काय ?
घरातून निघणं आणि घरी परतणं
ही क्रिया इतकी निर्जीव कशी झाली याचे उत्तर शोधतोय
बऱ्याचदा सांजेस शहरातल्या रस्त्यांवरचा कोलाहल खूप आधार देऊन जातो
एकटं असल्याची जाणीव करकचून मोडून काढतो
कधी कधी वाटतं
ही संध्याकाळ, हा गोंगाट संपू नये, हे रस्ते संपू नयेत
नेमकी ही कशाची ओढ आहे कोडं काही सुटत नाही..

- समीर गायकवाड 

Saturday, 6 March 2021

रंग उदास झाला...

जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला...
हंबरला पिंपळ सांज आभाळी साकळताना
 
शांत जलौघात उतरले प्रतिबिंब अखेरच्या पक्षांचे
घुटमळला प्रवाह नदीचा शोधता तिच्या ठशांना.
 
मेंदीचा हातावरल्या तिचा गंध उरला भवताली
जडशीळ झाली नदी वाहून तिला नेताना

गेले स्वप्न विरघळून पापण्यात चिणलेले
गहिवरल्या चांदण्या डोळ्यात निष्प्राण डोकावताना
 
जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला
मुका झाला रावा चंद्रकोरी आड जाताना....
~~~ ~~~~ ~~~ ~~~~ ~~~~~
या कवितेची पार्श्वभूमी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. बनारस म्हणजेच वाराणसीच्या
मणिकर्णिकेच्या घाटावर मृतदेहांवर संस्कार करण्याचं काम अविरत सुरु असतं. दहन देण्याआधी जातधर्म कुळ गोत्र सांगावं लागतं. मग मुर्दहिया त्या प्रेताचे अग्नीसंस्कार पार पाडतो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बनारसमधील शिवदासपूर या वेश्यावस्तीत मरण पावलेल्या बायकांना इथं दहन दिले जात नसे. इतरत्रच त्यांचे विधी पार पाडावे लागत असत. १९९२ मध्ये अकाली मरण पावलेल्या जसोदाबाई या तरुण वेश्येचा मृतदेह अन्य वेश्यांनी लपूनछपून घाटापाशी आणला. मात्र स्त्रियांना पुढे येण्याची अनुमती नसल्याने त्यांनी वेगळी शक्कल लढवली. घाटाच्या पुढच्या भागात त्या गोळा झाल्या आणि जसोदेच्या इच्छेनुसार अग्नी न देता तिला गंगेच्या हवाली केलं. असेही तिथे अर्धेमुर्धे जळालेले मृतदेहही बऱ्याचदा गंगेत सोडले जातात. त्या अर्धवट जळालेल्या कलेवरांच्या साथीने जसोदेचा देह वाहत गेला. काही दिवसांनी बिंग फुटलं. पोलिसांना बायकांना दम देऊन सोडलं. आता परिस्थिती बदलली आहे मात्र रिवाज तेच आहेत. ही कविता जसोदेसाठी लिहिलीय....

मरणाऱ्याच्या पाठीमागे...

कुणी एक मरण पावल्याची बातमी कळताच 
अर्ध्याहून अधिकांना यात स्वारस्य असतं की 
काय झालं ? कशामुळे मरण आलं ?

वास्तवात हे कशासाठी जाणून घ्यायचं असतं ?
मरण कसं आलं हे उमगताच मृताबद्दलचे पूर्वानुग्रह कच्चेपक्के करायचे असतात
व्यक्ती मरण पावल्यावर श्रद्धांजल्या वाहताना ते कामी येतात !

एक सांगू का ? 
माणूस मेला बात खतम. 
मागच्या श्रद्धांजल्या सब झूठ

एक शिरस्ता म्हणून जगाप्रमाणेच मी ही वाहतो श्रद्धांजली
पुढच्याच क्षणाला दुसऱ्या एकाला देतो शुभेच्छा
सारंच कोरडं... 

तरी एक बरे झाले 
की इमोज्या आल्या. चार शब्द टायपायचे कष्ट वाचले
तसेही श्रद्धांजली, शुभेच्छाही कॉपीपेस्टेड असतात तरी कुणाला कळते काय ?

अपवादाची बेसरबिंदी सोडता  
तिथं सारा समांतर शुष्क भावबाजार
स्वस्त झाल्या भावना नि फुटकळ झाले प्रकटन विचार ... 

लोक वदतात बद्धकोष्ठी भाव आणून, 
कुणी म्हणतो मोठी पोकळी निर्माण झाली. अपरिमित हानी झाली 
अमुक एक पोरकं झालं. वाणी खुंटली. स्तब्ध थिजून अबोल झालो...

खरं तर सर्वांनाच ठाऊक असतं की 
घंटा फरक कुणालाच पडलेला नसतो
ज्याचं रक्ताचं गेलेलं असतं त्याचा तरी शोक किती खरा असतो ?
 
किती एक बोल फुकाचे 
खरे तर हे नाममात्र दाखले सुखदुःखात सामील असल्याचे
भीती असते भावनेच्या प्रवाहात नसलो तर संवेदनहीन ठरण्याची  

वास्तवात इथल्या रोजच्या मरणांचे दुःख तरी किती कुणी आणि का करावे ?
बरे झाले दोस्त हो 
मरणाऱ्याला कळत नसते, जग पाठीमागे त्याच्याबद्दल काय बोलत असते !

- समीर गायकवाड

Monday, 22 February 2021

भूक

स्वप्नात काहीबाही येतं.
बालपणी शाळेबाहेर कुष्ठरोगी भीक मागत बसलेला असायचा.
तेलकट चेहऱ्याचा, कानाच्या पाळ्या जाड झालेला
नाकाचा सांडगा झालेला, गालाची हाडे वर आलेला
डोईचे केस आणि डोळ्याच्या पापण्या झडलेला, भुवया विरळ झालेला
कालच्या स्वप्नात हाती तेच काळपटलेलं जर्मनचं वाडगं घेऊन फिरत होता
फिरून फिरून त्याच्या पावलांत बैलाचे खुर फुटलेले
अन्नाच्या शोधात तो वणवण भटकत होता
खूप काळ फिरत होता तो
त्याचं शल्य त्याच्या डोळ्यात स्पष्ट तरळत होतं
बराच वेळ असाच निशब्द गेला.
काही क्षणासाठी डोळ्यापुढे अंधार झाला आणि
तो पुन्हा दिसला..

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...