Tuesday, 26 March 2019

आठवणींच्या पाकळ्या

कालच ती भेटली.
तेंव्हा तिला सांगितलं,
तुझ्या बंदिस्त घराभोवती चौदिशेने कुंपण बांधताना
किमान त्यास तरी एक दरवाजा ठेव
एखाद्या दिवशी तुला
जगाची गरज नक्कीच भासेल.....

माझ्या मात्र दशदिशांनाही कुठेच दरवाजे नाहीत
की खिडक्या नाहीत.
जीव गुदमरवणारी सर्वव्यापी रेंगाळणारी निर्वात पोकळी फक्त आहे.
माझ्यासाठी कुणी दारं उघडी ठेवली असती
तर मी इथे असलो नसतो.

कबरीवरून काल माझ्या ती हळुवार हात फिरवून गेली तेंव्हा
तिच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू होते
काही हुंदके आणि कढ ठेवून ती गेली.
आता माझ्या भवताली आठवणींच्या सदाबहार पाकळ्या भिरभिरताहेत....

- समीर गायकवाड

Saturday, 23 March 2019

जाताना सांगून तो गेला होता...


जाताना सांगून तो गेला होता, "आता लवकरच मी परतेन घरी
वचन तुला दिलेलं अधूरं राहिलं तरी भारतमातेचं वचन मात्र पुरं करेन" 

वचन मला दिलेलंही त्याने पुरं केलंय, तो खरेच लवकर घरी आलाय
पूर्वी गणवेशात घरी यायचा, यावेळी तिरंग्यात लपेटून आलाय.

त्याचं मुखकमल पाहून हरखलेली माय म्हणतेय, हिरा माझा कसा निजलाय
त्याला छातीशी आपल्या गच्च धरून वृद्ध पित्याने मात्र हंबरडाच फोडलाय 

जिचा तो सौभाग्य अलंकार होता तिचा साजशृंगार कधीच गळून पडलाय
तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा हा एकच ध्रुवतारा होता जो निखळलाय

कसे सांगू मी तुम्हाला, "की सरहद्दीहून कुणाची माती आली आहे ?
हा अन्य कुणी नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा, हा मोठा बंधू आहे ! "...

हा तुकडा काळजाचा असा अवचित कसा गळून झडलाय

सहवेदनेसाठी जमलेला भावूक जत्था अल्पजीवी आहे, उद्याचा सवाल पडलाय..     

Tuesday, 5 March 2019

मैत्र


धगधगत्या निखारयावरून चालताना स्वतःला जाळून
दुसरयासाठी त्या विस्तवाचं चांदणं करतात,
आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करून दुसरयांची सुखे सजवतात,
आपली अडचण लपवून सदैव मदतीचा हात पुढे करतात,
आपल्या वाट्याचं आभाळ दुसरयाच्या अंगणात रितं करतात,
ते मित्र असतात.....

Tuesday, 26 February 2019

दरवळ


तुझ्या ऑफिसच्या रस्त्यावरचीच गोष्ट आहे,
काल पाऊस पडत असताना ज्या झाडाखाली उभी होतीस
त्या झाडाची तमाम हिरवी पिवळी पानं बेहोष झालीत..

आताच मी ऐकलंय, ते झाड डोळे मिटून पावसासाठी दुवा करत होतं !
________________________________________________

जुन्या घराजवळ तुझ्या, काल गेलो होतो
अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांत अजूनही तुझ्या अश्रूंचा दरवळ होता.
परतून आलीस कधी तर पानांना विचार
श्वासात माझ्याही गंध तुझाच भरलेला होता!

कावरा बावरा होत, तिथंच घुटमळत होतो
सागवानी बंद दारातही तुझ्या दिसण्याचा तोच जीवघेणा भास होता.
समजून घेतलंस कधी तर श्वासांना विचार, 
काळजात तुझ्याही परिमळ माझाच होता !

___________________________________________________



अलीकडे हे असेच होते, त्वरित रिप्लाय द्यायचे ठरवतो 

आणि नकळत अंगणातल्या पारिजातकात गुंतून पडतो...
फुलांचं बहरणं चालूच राहतं, 
त्या नादात शब्द विसरून जातात...
बघता बघता रिप्लायला उशीर होतो...
पाकळ्यांवरचे दवबिंदू डोळ्यात दाटले की भानावर येतो 
पाहतो तर शाईत फुलांचा गंध दरवळत असतो !!!...

_______________________________________________

खिडकीतून गरम हवा आली तेंव्हाच ओळखले मी
पडद्याआड तुझेच ऊर धपापले असणार !
उंबरठयावरची रांगोळी सांगून गेली मजला,
येण्याची माझ्या, प्रतिक्षा अनंत झाली असणार !

मी असाच आलो अवचित वारा जसा पदराशी खेळाया
तू होती भिनवित आठवणी ऐन्यात हळदीच्या राया
येताच घरात मी, शहारल्या माळावरच्या मुग्ध आमराया !
चल पसरू दे दरवळ, वारा गंधवेडा आसुसला असणार !


- समीर गायकवाड 

Wednesday, 6 February 2019

सावल्यांचा गंध


क्षितिजाच्या खोल डोहात आता काही वेळात हा केशरी सूर्य बुडून जाईल

माझ्या दिवाणखान्यातल्या तिच्या सावल्या ज्याने सोबत नेल्यात.

आता या अंधाररात्रीस अंगभर चांदणं ल्यालेला चंद्रमा खिडकीत येऊन बसेल

ज्याला वेड लागलेय तिच्या सावल्यांच्या गंधाचे, त्याला आता काय सांगावे?

- समीर गायकवाड 

Monday, 28 January 2019

उद्याचा काळ

काजव्यांची गर्दी दारी तुझ्या असली तरी,
तारांगण उद्याचे माझेच असणार आहे.

सूर तुझे जरी लागले खास असतील तरी,
मुक्त बंदिशी उद्याच्या मीच गाणार आहे.

तोरणे फुलांची लागली तुझ्या घरी तरी,
बाग फुलांचा उद्या माझाच असणार आहे...

रचून घे कवने खोट्या किती शब्दांची तरी,
शब्दांना वेसण उद्या मीच घालणार आहे.

कैफ वाऱ्याचा साजरा कर भरभरून उरी,
दिशा वादळाची उद्या मीच बदलणार आहे.


दुःखाच्या डागण्या मला खुशाल दे परी,
येणारा काळ हसणार तुझ्यावर आहे !!

समीर गायकवाड

Tuesday, 22 January 2019

नभाच्या गर्भात

कोलाहल दूरवर उठवळ उन्हांचा
गायीच्या डोळ्यातले बेट साकळे मनात
पान्हा आटता नदीच्या स्वप्नांचा
रत्नजडीत पिसारे मोरांचे कुढती वनात
तूझे सुतोवाच करतो रव उल्कांचा
झुरतो पाऊस उष्म नभाच्या गर्भात...

अन्वयार्थ –

या कवितेत 'उठवळ उन्हे' हे प्रतिक आहे जगातील अघोरी लोकांचे जे इतरांच्या भावविश्वात डोकावून त्याचे जगणे हराम करून जातात. अशा वेळी दुःखांचे कढ नकळत मनात साठत जातात. नवा उन्मेष, सृजनता सगळं काही बेचिराख होऊन जातं जणू काही नदीचा पान्हा आटावा अन तिचे पात्र कायमचे कोरडे पडावे तसे मन शुष्क होऊन जाते ! प्रतिभेचे पंख झडून पडतात आणि मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेऊ लागते, जे कधीच हाती लागत नाही त्यासाठी कुढत राहते. अशा वेळी जन्ममृत्यूचे प्रतिक असणारी उल्का जगण्याचा नवा संदेश घेऊन येते. उष्म मेघांच्या गर्भात रोज नव्याने निजताना प्रतिभाशक्तीला नित्य नवे धुमारे फुटू लागतात पण व्यक्त होता येत नाही की मनसोक्त कोसळता येत नाही म्हणून केवळ झुरणे उरते! अशा अर्थाची ही कविता.

- समीर गायकवाड

Tuesday, 15 January 2019

शोध


मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
वाटेवरच्या बांधात घुटमळत राहते, कुंबीच्या दगडातील कड्या कपारीत घुमत राहते. 
गवताच्या पात्यांना कुरवाळते त्यांची ख्याली खुशाली विचारते आणि डोळे पुसत राहते !
माळावरच्या वड चिंचांना फेर धरून झोंबत राहते, ओल्या सुक्या पारंब्यावर झोका घेते.

बहक


तळपत्या उन्हात तिच्यावर काय कविता लिहू ?
थोड्याशा उन्हानेच तिची नाजूक सावली करपते !
खिडकीच्या आड तीच उभी आहे आत कशाला पाहू ?
तिच्या देहाचाच गंध असणार, हवा का उगाच बहकते !

- समीर गायकवाड 

Wednesday, 9 January 2019

देहगंध



पाऊस पडणार आहे म्हणे.
मग जमल्यास असं करशील का,
आपण ज्या झाडाखाली भिजलो होतो तिथे जाऊन तू उभी राहा.
पुन्हा कधी तरी मी ही तेथे जाईन तेंव्हा

तुझ्या देहगंधात न्हालेलं पाऊसपाणी पिऊन तृप्त झालेली पानं
तुझ्या देहाची कळा माझ्या काळजात कोरतील !

Tuesday, 1 January 2019

पाठीवरचा तीळ


तिच्या मखमली पाठीवरचा तीळ त्याच्या डोळ्यात विसरलाय
तर पहिल्या मिठीनंतर त्याच्या काळजाचे ठोके तिच्या हृदयात हरवलेत
या गोष्टीला तप उलटलंय....
आता तो तिच्या घरी जात नाही की ती त्याच्या घरी येत नाही
पण दोघांना ठाऊक असतं की विसरलेलं कुणीच नसतं
अधुरं राहिलेलं काही सांगायचं असलं तरी गाठभेट होऊनही बोलायचं नसतं.
पूर्वी ते लोकांच्या नजरा चुकवत एकमेकांना पाहत
आता एकमेकांच्या नजरा चुकवत ते लोकांना पाहतात.
इतकं होऊनही एकमेकाच्या मनातलं त्यांना नेमकं ओळखता येतं

- समीर गायकवाड 

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...