Saturday, 11 October 2025

स्वप्नांच्या शेवऱ्या



बहुधा त्यांची ती अखेरची भेट होती, 
खरेतर ते निरोप घ्यायला आले होते बराच वेळ ते एकत्र थांबले, खूप काही बोलले नाहीत
 
ते त्यांच्या आवडत्या नेहमीच्या ठिकाणी, तळ्याकाठी नि:शब्द बसून होते
त्याने आपला हात तिच्या कोमल हातावर ठेवलेला होता
 
त्या स्पर्शातून त्यांची स्पंदने वाहत होती, शेवटी वेळेची मर्यादा सरली
ते दोघेही यंत्रवत उठले, त्यानं तिच्याकडे डोळे भरून पाहिले

Friday, 10 October 2025

सीनामायचं पाणी..

या आठवड्यात गावात अतिवृष्टी झाली
भयंकर पूर आला, शेती बुडाली, गावाची दुर्दशा झाली;
दोन वर्षांपूर्वी म्हाताऱ्या आबाजीच्या पोक्त मुलाने
नापिकीपायी बांधावरच्या लिंबावर फास घेतलेला.

Friday, 26 September 2025

पाण्यात वाहत आलेली स्वप्ने..



लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला,
पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या
निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,
मदतीच्या आशेने एखादे स्वप्न घट्ट बिलगेल तुमच्या पावलांना.
क्षणभर तरी, त्याला उराशी कवटाळून घ्या,
त्याचं सांत्वन करा, त्याच्याशी बोला
मग, तुमचं काळीज डोळ्यांतून वाहू लागेल!
 
- समीर गायकवाड

Monday, 2 December 2024

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!


अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर
एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन !
मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्या दोन जास्वंदी
मॉलपाशी हसत होत्या लडिवाळ शेवंत्या
कॅफेबाहेर फुलत होत्या गुलबक्षीच्या कळ्या
होस्टेलसमोरच्या गार्डनमध्ये झुलत होते कळीदार गुच्छ
एका लयीत जात होत्या पाठीवर सॅक लावलेल्या निशिगंधाच्या जुड्या
गच्चभरल्या सिटीबसच्या खिडकीतल्या जाईजुईचा तजेला हवेत होता भरून
लायब्ररीच्या पार्किंगमधल्या गुलाब कळ्यांना पेलवत नव्हतं पुस्तकांचं ओझं
ज्युबिली हॉलच्या इनर सेक्शनमध्ये दरवळत होता गंधवेड्या मोगऱ्यांचा जत्था
रस्त्याच्या कडेने आईबाबांसह घुमत होती काही सोनकुसुमं आणि सोनकळ्या....

निर्भया, असिफा, ट्विंकल आणि कालपरवाची प्रियंका
अशी लाखो फुलं अकाली चुरगाळली गेली तरी
माझ्या शहरातल्या फुलांनी बहरणं सोडलं नाही, ती अखंड फुलताहेत,
या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे! 🌺🌸🌼🌹🪻🌷

या फुलांनी फुलतच राहावं, अखिल चराचराने यांना जपावं!🌿🍂
हे प्रसन्न तजेलदार ताटवे पाहून सकलांचा अमलताश व्हावा..

- समीर गायकवाड

Tuesday, 24 September 2024

चार कावळे (चार कौए)


खूप नव्हते, होते फक्त चार कावळे काळे
त्यांनी हे निश्चित केलं की उडणारे पक्षी सारे

त्यांच्याच ढंगाने उडतील, थांबतील, खातील आणि गातील
ते ज्याला उत्सव घोषित करतील तोच सारे साजरा करतील
 
कधी कधी जादू होऊन जाते विश्वामध्ये
दुनियाभरचे गुण दिसतात अवगुण्यामध्ये!

हे चार अवगुणी, मोठे मुकुट शिरोमणि झाले
गिधाड, गरुड आणि बाज यांचे सेवक झाले

हंस, मोर, चातक, चिमण्या सारे खिजगणतीत
हात बांधून सारे उभे राहिले विनम्र मुद्रेत

हुकूम झाला, चातक पक्षी गुंजारव करणार नाहीत
'पिहू पिहू' सोडून त्याऐवजी काव काव गातील

वीसेक तऱ्हेची कामं दिली गेली चिमण्यांना
खाणंपिणं, मौज मस्ती बिनकामाच्यांना

कावळ्यांचं असं फावलं की पाचही बोटे तुपाशी
मोठे मोठे मनसुबे प्रसवले त्यांच्या मनाशी

उडण्याचेही नियम असे काही बदलले
की उडणारे फक्त जागीच बसून राहिले

पुढे काय घडलं, सांगणं फार कठीण आहे
हा काळ कवीचा नसून चार कावळ्यांचा आहे

उत्सुकता वाटलीच तर यावे माझ्या घरी
गोष्ट ही मोठी, थोडक्यात कशी ऐकवावी

प्रसिद्ध कवी भवानीप्रसाद मिश्र यांच्या विख्यात 'चार कौए' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद. आज हिंदी दिवस. हिंदीवर प्रेम करणाऱ्या सर्व बहुभाषिकांना हिंदी दिनाच्या सदिच्छा!

- समीर गायकवाड

अर्थ बेगडी उत्सवाचे!



होती कुंद पावसाळी पहाट नि हवाही बऱ्यापैकी स्वच्छ
खिडकी बाहेर डोकावलं तर चेहरा ओळखीचा दिसला.
हा तर सेलिब्रिटींचा तारणहार, इकडे कसा काय आला?
"बाप्पा! अहो बाप्पा! इकडे पाहा!" हाक मारली त्याला!

म्लान होता चेहरा, नेत्रही सुकलेले; देहबोली नैराश्याची
"गर्दी संपली का मांडवातली?" प्रश्न ऐकता नजर झुकली
"आता नसतो मी त्या दरबारी, तिथे वसतो धनिकांचा 'राजा'
शोभिवंत मुर्ती नि उंची आरास, श्रीमंतांच्या पायी गालिचा
सच्च्या भक्तांवर जबरदस्ती, कुठवर पाहू हा भाव दुजा

दमलो आता, कानही किटले! वाटते, नको ती प्राणप्रतिष्ठा
तसाही नसतो मी या मांडवां, वाटते प्रयाण करावे कैलासा
मग स्मरतात सच्चे गणेशभक्त, उरलो त्यांच्या भक्तीपुरता
काय करावे सुचेना, उत्सवाआड बाजार मांडलाय नुसता
यासाठी का केला होता, अट्टाहास सार्वजनिक उत्सवाचा

लालबागसारखे मांडव कधीच सोडलेत, भटकतो वणवण
तुमच्या बालपणीचा बाप्पा कधीच हरवलाय, उरले स्मरण
निरागस किशोर होतो मीही नाचायचो, गायचो तुमच्यासवे
आता कोंडूनि मांडवांत सोबत हिडीस गाणी नि हैदोस नवे
जीव लागत नाही आता, रडू जुन्या आठवणींनी कोसळते

कुठे गेला तो उत्सव, कुठे गेले ते पावित्र्य? काय झाले त्यांचे
शांतताही नसते; स्तोम किती माजवले तुम्ही मिरवणुकांचे!
काय ते आविर्भाव नि किती तो आवाज, जीव गेले कैकांचे
माझीही वर्गवारी केलीत, नकोत फेटे मला खोट्या मानाचे
मन रमत नाही आता, वेध लागलेत मायबाप उमा महेशाचे

रजा घेण्या करिता, हितगुज करतोय जुन्या गणेशभक्तांशी
निघतो मी आता, तुमचे हे दोषभारित जग सांभाळा तुम्ही
असेन नित्य तुमच्या हृदयी, नि जळीस्थळी काष्टी पाषाणी
मात्र असेल अट एक, असेल ज्याला चाड नैतिक मूल्यांची
असेल किंमत सृष्टीची मानवतेची, राहीन तिथेही निवासी."

बोलून इतके तो गेला निघून, खांदे झुकवून संथ चालीने!
दमला असेल खूप तो, काय नसेल सोसले असेल त्याने
झाला असेल कितीदा खजिल, थिजला असेल घुसमटीने
गेली कैक वर्षे होता तगून, सच्च्या भावभक्तीच्या ओढीने
नुरली आता स्नेहार्द्रता, विटला असेल तो बाजारीकरणाने

सहनशक्तीचा त्याच्या न पाहावा अंत, आवतण अनर्थास!
सरली आस्था नुरली स्नेहर्द्रता, अर्थ काय बेगडी उत्सवास!

- समीर गायकवाड

Tuesday, 15 August 2023

हृदयस्थ दरवळ ..





त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती,
'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात.
बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात.
तिने टेक्स्ट मेसेज केलेला -
'काहीही अडचण न सांगता नक्की ये... '


जगभराचे ओझे बाजूला सारून
तो वेळेवर येऊन थांबलेला.
घामेजलेल्या चेहऱ्याने.
लांबूनच ती येताना दिसली.
हायसे वाटले तरीही
घशाला कोरड पडली होतीच.
घाईघाईने रस्ता ओलांडून ती समोर आली.

Monday, 3 July 2023

बाप होणं सोपं आहे! पण..

 वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा.

आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो!
मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की
अपराधी भावना दाटून येते.
आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत
मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.

जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली
पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला.
धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि
मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो.
खरं तर आता कळतं की
वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती,
त्यातही कोमलता होती
पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो
तसं वडिलांचं झालेलं असतं.

मखमल

आज्जा सांगायचा, "कधी बी गावाकडं आलं की आधी मला भेटायचं.."

आता तो नाहीये, त्याला जाऊन दशके लोटलीत, तरीही तो भेटतच असतो!
गावाकडच्या रस्त्यांनी असलेल्या घनदाट झाडांच्या सावलीत
पांदीतल्या शांत शीतल आमराईत, गावंदरीच्या जुनेर घालमेलीत!

आज्जा भेटतो वेशीवरल्या मंदिराच्या गाभाऱ्यात, शिवंवरल्या पिंपळांच्या पारंब्यात
शेताच्या वाटंवरल्या डोहात अन् गव्हाच्या कोवळ्या लोंब्यांत

घरी गेलं की आज्जा दिसतो ढेलजंत, पडवीत तर कधी दिसतो अंगणात,
सारवण केलेल्या भिंतींना टेकून बसलेला तर कधी पोत्यांची चवड रचणारा

तुळशी वृंदावनात तेवणाऱ्या पणतीच्या मंद ज्योतीत त्याचा चेहरा तरळतो
कंदिलाची काच पुसताना, आरशात डोकावताना, विहिरीत उतरतानाही तो दिसतो

जुंधळ्याला लगडलेल्या चांदण्यांत तो चमकतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यांत पाझरतो
बांधावरल्या बोरीबाभळींच्या काट्यात वसतो, दावणीतल्या मूक वेदनांमध्ये झुरतो

आज्जा नांगराच्या फाळातून मातीत शिरतो, कंच पिकांतून उगवून येतो
हिरव्या पिवळ्या कोंबांच्या देठांत राहतो, कळ्यांची फुले होताना उमलून येतो

आज्जा नाही असा परीघ नाही,
आज्जा काळजात असतो आणि नातीला लावलेल्या काजळातही असतो
रातीला बाजंवर झोपी गेलं की बिलोरी चांदण्यांतुन खाली उतरतो,
अलगद गाल कुरवाळतो,
त्याच्या हातावरची मखमल गालावर ठेवून पहाटेस निघून जातो!

आज्जा पिढ्या न पिढ्या जिवंत असतो!
फक्त नावं बदलत जातात, माणूस तोच असतो!

- समीर गायकवाड

Wednesday, 31 May 2023

मौनातला संवाद

अंधार बऱ्यापैकी गडद झाल्यावरसोसायटीच्या बाहेर मेन रस्त्यावरची वर्दळ कमी होते
एरव्ही कंजेस्टेड वाटणारा रस्ताही भलामोठा वाटू लागतो.
जिथे स्ट्रीटलाईटचा उजेड क्षीण झालेला असतो
त्या भागात रस्त्यालगतच्या फुटपाथवर 'ते' दोघं नकळत येऊन बसतात.
दोघेही असतात धुमसत अंतर्बाह्य !

वन नाहीतर टूबीएचकेच्या खुराड्यात रोजच उडत असतात खटके
कधी तिचे तर कधी त्याचे,
कधी कामावरून तर कधी पैशाच्या कडकीवरून
तर कधी घरातल्याच कुणाशी तरी वाद झाल्यावरून नाहीतर रोजच्याच टोमण्यांवरुन!
दोघे परस्परांना वैतागलेले असतात,
नातं अक्षरशः नको नकोसे झालेलं असतं.
ते हमरातुमरीवर येतात
मात्र आपला आवाज कुणालाही ऐकू जाणार नाही याची दक्षता घेत असतात.
खूप वादावादी होते.

Tuesday, 28 March 2023

ओळखीच्या गल्लीतले हरवलेले घर..

sameerbapu


         ओळखीच्या गल्लीतले हरवलेले घर

काही गल्ल्या ओळखीच्या असतात, तिथली काही घरे मेंदूत घर करून असतात.
त्यातही एखादं घर खास असतं.
तिथून कधी येताना जाताना उगाच शोध घेत असते नजर,
आपलं तिथं कुणी आता राहत नाही हे ठाऊक असूनही!
आपण रेंगाळतो,
नजरेत साठवतो तिथले दरवाजे, खिडक्या नि अंगण,
सुकून गेलेल्या वेली अन् हिरमुसलेली झाडं!
तरीही आपल्याला वाटतं की उघडा राहील दरवाजा कधी तरी
अन् खुली असेल खिडकी
फुलून येतील वेली नि झाडेही होतील हिरवीकोवळी!

पण असं घडत नाही.
दिवस वेगाने ढळत जातात..
ते घर काही केल्या पहिल्यासारखं भरभरुन नांदत नाही
पण मन मात्र भरुन येतं, पुन्हा पुन्हा!
डोळ्यांच्या ओलेत्या कडांत त्या घरातली माणसं तरळत राहतात,
आयुष्यभर!
______________________________________________

'त्या' गल्लीतून येणारा वारा माझे घर शोधित येतो
अंगणातल्या निशिगंधाची दोन फुले खिडकीत टाकून जातो
त्या फुलांना 'त्या' माणसांचा दरवळ असतो!

कधी गेलोच 'त्या' घरी
तर न विसरता तिथल्या आरशात डोकावतो
प्रतिबिंबात माझ्यासोबत 'ती' माणसंही दिसतात
आरसा ओळखीचे हास्य करतो नि माझे डोळे पाणवतात!
_________________________________________________

'त्या' घराच्या अंगणातल्या झाडांत रोज रात्री चंद्रमा वितळतो
घर पुन्हा आबाद व्हावे म्हणून आर्जवं करतो
हसणारी बहरणारी माणसं परतून यावीत म्हणून
चांदण्याही मुक्कामी राहतात, सकाळी त्यांची प्राजक्तफुले होतात!
_________________________________________________

सासरी गेलेल्या स्त्रीला तिच्या माहेरच्या घरासारखं
दिसणारं घर कुठे जरी दिसलं तरी
अख्खं माहेर तिच्या डोळ्यात टचकन गोळा होतं!
काळाच्या एका टप्प्यावर तिने मागे सोडलेले घर
वर्तमान नि भविष्यातही तिची सोबत करत राहते,
ती पुन्हा पुन्हा त्याची अनुभूती घेत असते!
____________________________________________

'तिला' निरोप दिला तेंव्हा ठाऊक नव्हतं
की, तिच्यासोबत घराचे घरपण देखील जाणार आहे!
काही माणसं घरातून गेली की
त्या घरांचे चैतन्य हरवते. उरतात भिंती, छप्पर आणि
आपल्या आठवणींचे उदास पारवे!
_______________________________________________

'त्या' घराची भिस्त आता पाहुण्यांवर असते
कुणी आलंच हिरवंकोवळं बहारदार
तर घरपणही परतलेलं असतं!
तेव्हढाच शिडकावा पुरेसा असतो
जिंदगानीशी मुकाबला करायला!

आपल्याला ठाऊक असतं की,
कधीकाळी 'त्या' घराने आणि 'तिने'ही आपली प्रतिक्षा केली होती
जेंव्हा हे कळते तेंव्हा आयुष्यभर आपण शोधत फिरतो
खरे तर आपल्या पाठीला तिचेच डोळे असतात
मागे वळून पाहताना आपण उगीच रडत नसतो!
______________________________________________

आताशा 'त्या' गल्लीत टुमदार घरे असतात
घरांना नावेही असतात.
कर्त्या माणसांची पदेही नेमप्लेटवर लिहिलेली असतात
झाडे असतात, पक्षांचे पिंजरे असतात
'कुत्र्यापासून सावध राहा'चे फलकही असतात
गेटसमोर अलिशान गाड्या असतात
सारं काही असतं!
पण तिथं जिवाभावाची माणसं कुणीच नसतात!
_____________________________________

'त्या' गल्लीतल्या घरांचे पाडकाम सुरू झाल्याची
बातमी जरी कळली तरी मन हळवे होते
इतके काय गुंतलेले असते की
काळजातही लागलीच एक खोदकाम सुरू होते!

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...